Sunday, May 19, 2013

४९ . त्यामुळे असे घडले .

                       कथा विवेकानंद - ४९ 

     स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करायचे ठरविले . त्यासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु झाले . अनेक संथाल मजूर काम करू लागले .
     स्वामीजी त्यांच्या बरोबर बोलत, गप्पागोष्टी करीत . त्यांच्या सुखदुक्खाविषयी चर्चा करीत . त्या मजुरांमध्ये केष्टा नावाचा एक मजूर होता . तो स्वामीजींना खूप आवडे . 
     एके दिवशी स्वामीजींनी स्वतः भोजन तयार केले . त्या सर्व मजुरांना भरपूर अन पोटभर वाढले . स्वतः च्या हातांनी त्यांना वाढले . मजुरांनी तृप्तीचा ढेकर दिला . स्वामीजी प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये ईश्वराचा अनुभव करीत . त्यामुळे असे घडले .   

Saturday, May 18, 2013

४८. मला पहिली चिंता त्याची

                         कथा विवेकानंद - ४८ 

     स्वामी म्हणजे केवळ आध्यात्मिक चिंतन करणारे, पारलौकिकाचा विचार करणारे असा एक गैरसमज असतो . ते समाजाची चिंता करीत नाहीत असेही काहीजण समजतात . 
     स्वामी विवेकानंदांकडे काही समाजसेवक आले होते . बोलताना स्वामीजींच्या लक्षात आले की यातला एकजण पंजाबचा आहे . त्या दिवसात पंजाबात भीषण दुष्काळ पडलेला होता . लोक अन्नाला मोताद होत होते . 
     स्वामीजींनी चर्चेची गाडी पंजाबी रुळावर नेली . ते पंजाबातील दुष्काळाची चर्चा करू लागले . त्यावरील उपायांविषयी बोलू लागले . 
     पंजाबी गृहस्थ नाराज झाले . ' आध्यात्मिक काहीतरी ऐकायला मिळाले नाही ' असे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले .  
     स्वामिजींना राग आला. एकदम ते म्हणाले, ' माझ्या देशातील एक कुत्रे सुद्धा उपाशी असल्यास मला पहिली चिंता त्याची, मग अध्यात्माची . '  

Sunday, May 12, 2013

४७ . स्वामीजींची करुणा

                         कथा विवेकानंद - ४७

     सर्वधर्मपरिषद झाली आणि स्वामीजी प्रसिद्ध व्यक्ती बनले . मोठमोठ्या लोकांकडून त्यांना भोजनाची निमंत्रणे येऊ लागली . हिंदू धर्माच्या प्रचारार्थ त्यांचा ते उपयोग करू लागले . 
     अनेक घरी ते जात . अत्यंत थाटामाटात त्यांचे स्वागत केले जाई . थोरामोठ्यांच्या भेटीगाठी, सुग्रास भोजन, ऐषारामी रहाण्याची सोय अशी त्यांची व्यवस्था केली जाई .   
     असेच एक दिवस ते झोपले होते . त्यांच्या मनात विचार आला . माझ्या भारतातील कोट्यावधी बांधव उपाशी पोटी असताना मी सुग्रास भोजन करू शकतो काय ? भारतीयांना रहायला  झोपडीही नसताना मी महालात सुखनैव राहू शकतो काय ? 
     स्वामीजी पलंगावरून खाली उतरले . साध्या जमिनीवर ते झोपले . भारतीयांच्या दशेचा विचार करता करता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले . ते रडूं लागले . 

४६ . माझ्या बंधुंनो आणि भगिनिंनो !

                             कथा विवेकानंद - ४६ 

     स्वामी विवेकानंद  अमेरिकेला गेले . सर्वधर्मपरिषदेचा दिवस उजाडला . सहा हजार चोखंदळ श्रोत्यांचा समुदाय . काय बोलायचे ? काहीच लिहिलेले , टिपलेले नाही . मुद्दे नाहीत . 
     स्वामीजींच्या नावाचा पुकारा झाला . ते व्यासपीठावर गेले . समोर बघितले आणि क्षणभर घशाला कोरड पडली . डोळे मिटले गेले . गुरुजींचे ध्यान केले गेले . डोळे उघडले आणि . . . . 
     " अमेरिकेतील माझ्या बंधुंनो आणि भगिनिंनो  ! . . . . "
     पुढचे शब्द कोणाला ऐकू गेलेत ! सगळा प्रेक्षकवर्ग उठून उभा राहिला होता . टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाटाने आसमंत दुमदुमत होता . 
     संयोजकांनी विनंती केली आणि टाळ्या थांबल्या . ' सभ्य स्त्री- पुरुषहो ' ची प्रथा स्वामीजींनी मोडली होती . विश्वबंधुत्वाची शिकवण कृतीतून दिली होती . सारे जग एक कुटुंब मानले होते . ' माझाच पंथ खरा '  हि सेमेटीक विटी एकाच प्रहाराने तुकडे तुकडे करून टाकली होती . 
     छोटेखानी तीन मिनिटांचे भाषण संपले . जो तो धावत होता . स्टेजवर अहं व्यासपीठावर, आधुनिक व्यासांचा पदस्पर्श करायला ! 

Friday, May 10, 2013

४५. ते ज्ञानसूर्य आहेत .

                         कथा विवेकानंद - ४५ 

     स्वामी विवेकानंद सर्वधर्मपरिषदेसाठी अमेरिकेला गेले . परिषदेला महिना होता . शिकागोत रहायचे म्हणजे प्रचंड खर्च . त्यातच स्वामीजींचे परीचय पत्र गहाळ झाले . त्यांनी बोस्टनला जायचा विचार केला . 
     स्वामीजी बोस्टनला गेले . खर्चात बचत व्हायला लागली . परिचय पत्रासाठी  त्यांनी प्राध्यापक जॉन राईट यांची भेट घेतली . स्वामीजी व जॉन राईट यांची चर्चा झाली . 
     थोड्याच वेळात स्वामीजींची श्रेष्ठता श्री . राईट यांच्या लक्षात आली . ते म्हणाले, ' तुमच्याकडे परिचयपत्र मागणे म्हणजे सूर्याला विचारणे, तुला प्रकाशण्याचा काय अधिकार आहे . ' 
     त्यांनी मोठ्या आनंदाने शिफारसपत्र लिहिले . त्या पत्रात ते लिहितात . ' सर्वधर्मपरिषदेसाठी मी स्वामीजींची शिफारस करीत आहे . नावनोंदणी करायची वेळ टळून गेली असली तरी स्वामीजींना प्रवेश द्यावा . ते ज्ञानसूर्य आहेत . अमेरिकेतील सारे विद्वान तराजूच्या एका पारड्यात आणि स्वामीजी दुसरया पारड्यात घातले तरीही स्वामीजींचे पारडे जड राहील . ' 

Sunday, May 5, 2013

४४. समयसूचकता !

                      कथा विवेकानंद - ४४ 

स्वामी विवेकानंद अमेरिकेला चालले होते . वाटेत केंटन या चीनी बंदरात बोट थांबली . तेथे बरीच सुंदर सुंदर मंदिरे होती . स्वामीजी व काही प्रवासी दुभाषांना घेऊन मंदिरे पाहण्यासाठी निघाले . 
चीनमधील काही मंदिरात परकीय लोकांना प्रवेश नसतो . चुकून अशा एका मंदिरा जवळ ते जायला निघाले . परकीयांना बघताच गावांतील लोक लाठ्या काठ्या घेऊन धावत यायला लागले . ते आक्रमण बघताच सगळे धावायला लागले .
 स्वामीजी मात्र दृढपणे उभे राहिले . त्यांनी दुभाषाला विचारले की , हिंदू साधूला चीनी भाषेत काय म्हणतात ? 
दुभाषी म्हणाला , ' कबाच '
चीनी गावकरी जवळ येताच स्वामीजी ' कबाच, कबाच ' असे म्हणू लागले. 
त्याबरोबर सगळ्यांनी आपापली शस्त्रे खाली टाकली आणि ते स्वामीजींना पाया पडू लागले . क्षमा मागू लागले . 

Thursday, May 2, 2013

४३ समुद्रात फेकून देईन .

                    कथा विवेकानंद - ४३ 

     स्वामी विवेकानंद अमेरिकेला चालले होते . बोटीने प्रवास चालला होता . डेकवर अनेकांशी  गप्पागोष्टी होत . स्वामीजी बहुश्रुत होतेच . शिवाय वादात हार न जाणारे . 
     एके दिवशी दोन पाद्री स्वमिजींशी वादविवाद घालायला आले . हिंदू व ख्रिश्चन धर्मातील गुणदोषांची चर्चा व्हायला लागली . स्वामीजींच्या लक्षात आले की, हिंदूंच्या दोषांची आणि ख्रिश्चनांच्या गुणांचीच चर्चा होतेय . लगेच त्यांनी बाजू पळटवली . 
     ख्रिश्चनावर गोळी येताच त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला . त्या मिशनरयानी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले . ते हिंदू धर्माची गलिच्छ शब्दात निंदा नालस्ती करू लागले . 
     स्वामीजी थोडा वेळ गप्प राहिले . मिशनरी कसेच थांबत नाही हे बघताच ते एकाच्या अंगावर धावून गेले . एकदम त्याला म्हणाले, ' आता यापुढे हिंदू धर्माबद्धल  एक शब्द जरी बोलाल तर मी तुम्हाला उचलून समुद्रात फेकून देईन . ' स्वामीजींचा अवतार बघताच मिशनऱ्यांनी हळूच काढता पाय घेतला . 

Wednesday, May 1, 2013

४२. इच्छा तिथे मार्ग !

                    कथा विवेकानंद - ४२  

     स्वामीजी भारत भ्रमण करीत करीत कन्याकुमारीला आले . त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले . सागरासमोर ते उभे राहिले . भारतमातेचे पदवंदन करणारा अथांग हिंदुसागर समोर उसळत होता . त्यांनी समोर बघितले. कन्याकुमारीने तपःश्चर्या केलेली शीला श्रीपादशीला समोर होती . 
     गेल्या अडीच वर्षात काय नाही पहिले ?  पारतंत्र्यात खितपत पडलेला देश . गरिबीमुळे अन्नान्न झालेले लोक . आपल्याच श्रीमंती धुंदीत मदमस्त असलेले श्रीमंत आणि राजेमहाराजे . अन कर्तव्यविन्मुख झालेले समाजधुरीण . 
     स्वामीजींनी नावाड्याला विनंती केली . त्या शिलेवर पोहोचवायला सांगितले . पण स्वामीजी संन्याशी . पैसे कोठून देणार ? नावाड्यांनी नकार दिला . इच्छा असते तिथे मार्ग असतोच . मोठी माणसे कधीही अडथळ्याना जुमानीत नसतात . त्यावर मात करून ती नेहमी पुढे जातात . आणि म्हणूनच ती महान बनतात .  स्वामीजींनी क्षणभर विचार केला . निर्णय पक्का केला . आणि त्या उधाणलेल्या सागरात उडी ठोकली . भारतमातेचे दर्शन घेण्यसाठी .