Tuesday, April 30, 2013

४१. मूर्ख माणसांशी गाठ

                        कथा विवेकानंद - ४१ 

     स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करीत होते . त्यांच्या समोर दोन ब्रिटीश माणसे बसली होती . पहिल्या वर्गाच्या डब्यात भारतीय माणसाने बसणे . त्यांना आवडले नव्हते . आमची गुलाम माणसे आमच्या बरोबर बसतात म्हणजे काय ? आणि त्यातही कहर म्हणजे हा हिंदू साधू !
     ब्रिटिशांचे एकमेकात बोलणे सुरु झाले . भारतीय, त्यांचे देव, हिंदू संन्यासी  यावर ते टीका करायला लागले . टीकेचे रुपांतर साहजिकच त्यांच्या स्वभावानुसार टिंगलीत झाले . स्वामीजी मात्र आपल्याला काही कळत नाही असे भासवीत त्यांचे बोलणे ऐकत होते . 
     पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली . समोर स्टेशन मास्टर उभा होता . स्वामीजींनी त्यांना इंग्रजी भाषेत विनंती केली . ' मला थोडे पाणी मिळेल का प्यायला ? ' 
      समोर बसलेले ब्रिटीश प्रवासी सटपटले . आपण जे काही बोललो,    भारतीयांची निंदानालस्ती केली ती याला समजली . मग हा बोलला कसा नाही ? 
     उर्मटपणे ते स्वामीजींना म्हणाले, ' एवढा वेळ तुम्ही गप्प कसे राहिलात ? '
     स्वामीजी उत्तरले, " मूर्ख माणसांशी गाठ पडण्याचा हा काही माझा पहिलाच प्रसंग नाही ! " 

Monday, April 29, 2013

४० . फजिती करण्यासाठी आलेले अनुयायी बनले.

                        कथा विवेकानंद - ४० 

     दुसऱ्याची चेष्टा मस्करी करणे, थट्टा विनोद करणे ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खासियत . स्वामीजींना भेटावे, त्यांच्याशी वादविवाद करावा . त्यांना हरवून मग भरपूर हसावे . 
     एकाने स्वामीजींना प्रश्न केला, ' साधू महाराज, देव म्हणजे काय ? '       कधीतरी शेरास सव्वाशेर भेटणारच . स्वामीजींच्या ध्यानात त्यांचा हेतू आला . त्यांनी विचारले, ' मुलांनो, उर्जा म्हणजे काय ? '
     मुलगा गडबडला . त्याने थातूर मातुर उत्तर दिले . स्वामीजी म्हणाले, ' नव्हे हे उत्तर बरोबर नव्हे . यात हे चुकलेय . ' 
     त्याला सावरण्यासाठी इतर खटपट करू लागले . स्वामीजी त्यांच्या उत्तरातील फोलपणा दाखवू लागले . विद्यार्थी गप्प झाले . स्वामीजींनी मग त्यांना उर्जा व देव दोन्ही संकल्पना समजावल्या . फजिती करण्यासाठी आलेले अनुयायी बनले होते .      

Saturday, April 27, 2013

३९ . तिकीट तपासनीस पळाला

                        कथा विवेकानंद - ३९ 

     स्वामी विवेकानंद स्पष्टवक्ते होते . होणारा अपमान कधीही सहन करीत नसत .  एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते . बरोबर खेतडी संस्थानचे दिवाण जगमोहनलाल होते . त्यांना निरोप देण्यासाठी एक बंगाली मित्रही डब्यात आला होता  . 
     त्यांच्या गप्पा चालू होत्या इतक्यात एक इंग्रज तिकीट तपासनीस आला . बंगाली गृहस्थांना उद्धट भाषेत खाली उतरायला सांगू लागला . वास्तविक हे गृहस्थ रेल्वे कर्मचारी होते . आणि त्यामुळे त्यांना रेल्वेत यायची अनुमती होती . समजावले तरी तो तिकीट तपासनीस कसाच ऐकेना . 
     स्वामीजींनी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर तो ओरडलाच, ' तुम क्यों बोलते हो ? '
     स्वामीजी एकदम संतापले . ' तुम कोणाला म्हणता ? हिंदीत आदराने ' आप ' म्हटले जाते हे ठाऊक नाही का तुम्हाला ? '
     स्वामीजींच्या हल्ल्याने गांगरलेला तपासनीस म्हणाला, ' मला हिंदी फारसे येत नाही . मी या माणसाला . . . . '
     ' हिंदी तर तुम्हाला येतच नाही . तुमची इंग्रजीही येत नाहीशी दिसते . माणसाला नुसता मेन न म्हणता इंग्रजीत जंटलमेन म्हणतात .  तुमचा क्रमांक आणि नाव द्या पाहू . मला वर तक्रार करायचीय . ' स्वामीजी म्हणाले . तिकीट तपासनीस पळाला हे आणि सांगायला पाहिजे . 


Friday, April 26, 2013

३८ . मूर्तीत परमेश्वर बघतात .

                             कथा विवेकानंद - ३८ 

     तो काळ ब्रिटीश राजवटीचा होता . राजे महाराजे, उच्चशिक्षित यांच्यावर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव पडत होता . भारतीय ते चुकीचे आणि परकीय ते योग्य अशी धारणा बळावत चालली होती . 
     स्वामीजी महाराजांकडे असताना त्यांच्या लक्षात आले कि महाराजांचा देवावर, मुर्तीपूजेवर विश्वास नाही . इतकेच नव्हे तर ते मूर्तीपुजेची टिंगलही करतात . 
     एके दिवशी स्वामीजींनी एका अधिकाऱ्याला जवळ बोलाविले . समोर असलेली राजांची तस्वीर काढायला लावली . ते त्या अधिकाऱ्याला म्हणाले, ' या तस्वीरीवर थुंका पाहू . ' 
     अधिकारी गडबडला, इकडे तिकडे पाहू लागला . 
     स्वामीजी म्हणाले, ' अरे हि तर निर्जीव तस्वीर आहे . यात महाराज कुठे आहेत ? मात्र तू या तस्वीरीत महाराज बघत आहेस ! असेच सगळेजण मूर्तीत परमेश्वर बघत असतात .  '

Thursday, April 25, 2013

३७. गरमागरम रोट्या

         कथा विवेकानंद - ३७
     कृतज्ञताभाव  हा स्वामीजींचा गुणविशेष होता . स्वामीजी अमेरिकेहून परतल्यावर अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले . अलवारला असाच सत्कार होता . स्वामीजींना अनेक मोठमोठ्या घरी भोजनाची आमंत्रणे येत होती .मात्र स्वामीजींनी पहिले आमंत्रण स्वीकारले ते एका म्हाताऱ्या आजीबाईचे . 
     स्वामीजींनी त्यांना निरोप पाठविला . ' गेल्या खेपेला केल्या होत्या अगदी तशाच गरमागरम रोट्या मला पाहिजेत . ' आजीबाईचा आनंद कशात वर्णावा ! त्यांनी आनंदाने जेवण करून स्वामीजींना वाढले . स्वामीजी जेवत असताना जेवणाची भरभरून स्तुती करीत होते . ' आईने अशाच रोट्या सात वर्षांपूर्वी मला अशाच प्रेमाने वाढल्या होत्या, जेव्हा मी एक अपरिचित साधू होतो.    

Wednesday, April 24, 2013

३६. मला बंदुकीची गरज नाही .

             कथा विवेकानंद - ३६ 
     स्वामी विवेकानंदांचा मुक्काम महाराजांकडे होता . महाराजांनी शिकारीचा बेत आखला . स्वामीजीही बरोबर निघाले . शिकार वाघाची होती . 
     महाराजांचा लवाजमा शिकारीच्या तयारीत गुंतला . ते वाघाला घेरायच्या तयारीला लागले . इकडे स्वामीजी एका झाडाखाली बसून चिंतन करायला लागले . अकस्मात समोर वाघ उभा . स्वामीजी वाघाला बघतायत . वाघ स्वामीजींना बघतोय . असाच थोडा वेळ निघून गेला . बघून बघून वाघ निघून गेला . 
     इकडे महाराजांना वाघ आल्याची बातमी समजली . ते धावत धावत आले . आपली बंदूक स्वामीजींना देऊ लागले . स्वामीजी म्हणाले, '' पशू साधूनां काहीही करीत नाहीत . साधूकडून अपाय होण्याची भीती नसल्याने ते निश्चिंत असतात . मला बंदुकीची गरज नाही . '' 
  

३५. जीवाशिवाची भेट

            कथा विवेकानंद - ३५ 
     माणसे मोठी, कीर्तिवान होताच आपल्या मित्रांना, ओळखीच्या माणसांना विसरतात असा अनुभव येतो . स्वामीजी भारताचे पदभ्रमण करीत होते . एक भगव्या कपड्यातला सामान्य संन्यासी देश फिरत होता . अलवारला मुक्कामात असताना त्यांचा मित्र होता रामस्नेही . मळकट कपड्यातला एक फकीर .
     विश्वदिग्विजय केला आणि विवेकानंद प्रसिद्ध झाले . अलवारला त्यांचा सत्कार होता . प्रचंड मोठी गर्दी जमली होती . विवेकानंद संन्यासी . असल्या सत्कारात त्यांचे कुठले लक्ष ! ते गर्दी बघत होते . 
     त्यांची नजर एकदम रामस्नेहीवर गेली . कळकट कपड्यात गर्दीच्या एका कडेला ते उभे होते . स्वामीजी व्यासपिठावरून  ओरडू लागले . ' रामस्नेही, रामस्नेही ' लोकांनी रामस्नेहींना वाट करून दिली . ते व्यासपीठावर आले . विवेकानंद त्यांना कडकडून मिठी मारत होते . जणू जीवाशिवाची भेट होत होती .  

Tuesday, April 23, 2013

३४.संकटांचा सामना करा .

           कथा विवेकानंद - ३४  

      भारत भ्रमणाच्या काळात घडलेली गोष्ट . स्वामी वाराणसीला गेले होते . देवदर्शन करून स्वामी परतत होते . वाराणशीत माकडे भरपूर . देवदर्शनाला आलेल्या भक्तांनी दिलेल्या खाण्यामुळे तशी ती माजलेली . एखाद्या भक्ताने खायला दिले नाही तर बिनदिक्कत त्याच्या पिशवीत हात घालणारी . मिळेल ते खाणारी अथवा पिशवीच घेऊन पळणारी . 
     स्वामीजी चालत जात होते . अकस्मात ती माकडे स्वमिजीच्या मागे लागली . स्वामींनी हळूच आपली गती वाढविली . माकडे अधिकच जोराने मागे लागली . स्वामीजी पळू लागले . माकडेही धावू लागली . चावे घेऊ लागली . करायचे काय ? 
     एका साधूने बघितले . ते ओरडून इशारा करू लागले . ' थांबा, पळू नका . माकडांच्या दिशेने तोंड करा . त्यांच्या अंगावर धावून जा . ' 
     स्वामीजींना लक्षात आले . ते थांबले . अर्धवृत केले . आणि अकस्मात माकडांच्या अंगावर धावून गेले . कुठली माकडे अन कुठले काय ! माकडे पळून गेली होती .