Thursday, March 14, 2013

कथा विवेकानंद २६

                           २६. मला भूक नाही .

     नरेंद्रच्या वडिलांचे निधन झाले . वकील असल्यामुळे वडिलांचे उत्पन्न भरपूर . ' असतील शिते तर जमतील भुते ' या न्यायाने नातेवाईकांचा गोतावळा भरपूर जमा झालेला . गुळाला मुंगळे डसणारच . 
     विश्वनाथ बाबूंचे निधन होताच उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला . खायचे काय ? नातेवाईकांनी आपापल्या घरची वाट पकडली . जवळच्यांनी घरावर कोर्टाचा दावा लावला . आई तशी धीराची . आपल्या कच्च्या बच्च्यांना घेऊन संसाराचा गाडा ओढू लागली . 
     नरेंद्र पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला . संसाराला हात लागावा म्हणून तो नोकरी शोधू लागला . अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवले . पण नोकरी काही मिळेना . 
     एके रात्रीचा प्रसंग . नरेंद्र दमून भागून घरी आला . पोटाला भूक लागली होती . आई जेवण तयार करीत होती . नरेंद्र स्वयंपाक घरात डोकावला . जेवण थोडेच बनविले होते . त्याने आईला सांगितले . ' आई आज मी बाहेरून जेऊन आलेलो आहे . मला भूक नाही . ' 
     आपल्या भावंडांना थोडेतरी खायला मिळावे म्हणून नरेंद्र खोटे बोलला होता . 

No comments:

Post a Comment