१४५ मी माणूस जोडला
भारतीय स्वातंत्र्यानंतरचा काळ. गावातील शाळा. एक उपक्रमशील शिक्षक मुलांना शिकवित होते.
देशभक्तीचा पाठ शिकविताना त्यांनी मुलांना भारताचे एकेक मानचित्र दिले. ते म्हणाले, " मुलांनो, हे मानचित्र फाडा. त्याचे तुकडे तुकडे करा. "
मुलेच ती ! त्यांनी भराभर त्या मानचित्राचे तुकडे केले. आपल्या बाकावर पसरून ठेवले.
शिक्षक म्हणाले, " वा, छान ! आता हे तुकडे जोडा. मानचित्र पुन्हा तयार करा. "
मुले तुकडे जोडायला लागली. पण काही जमेना.
मागच्या बाकावर बसणारा अष्टावधानी मुलगा उभा राहिला. शिक्षकांना म्हणाला, " गुरुजी, मी बनवले मानचित्र. " गुरुजींनी बघितले. " छान. " ते म्हणाले.
त्या मुलाला वर्गासमोर उभे करीत गुरुजींनी विचारले, " कसे काय केलेस तू ? "
मुलगा अभिमानाने म्हणाला, " गुरुजी, मानचित्राच्या मागे माणसाचे चित्र होते. मी माणसाला जोडले. मानचित्र तयार झाले. "
मुलांकडे बघत गुरुजी म्हणाले, " मुलांनो, तुम्ही चांगले नागरिक बना. देश तयार होईल. देश म्हणजे देशातील माणसे. "
No comments:
Post a Comment