Saturday, February 1, 2025

१४६ संघर्ष हेच जीवन

                                               १४६  संघर्ष हेच जीवन 


एका गावात एक शेतकरी रहात होता. तसा तो कष्टाळू, मेहनती. देवावर विश्वास असलेला. त्याची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. पाऊस कधी भरपूर पडे कधी सरासरी. उत्पन्न कधी चांगले कधी जेमतेम.
एके वर्षी पाऊस कमी पडला. शेतक-याला बराच फटका बसला. राग आला त्याचा देवाचा. त्याने देवाला प्रसन्न करायचे ठरविले. तो तप करायला लागला.
देव प्रसन्न झाला. ' भक्ता काय पाहिजे ते माग. ' देव म्हणाला. शेतक-याने हुशारी दाखविली. ' देवा मला ऋतुचक्र दे. ' तो म्हणाला.
देव उद्गारला, " तथास्तु "
पुढील वर्षी शेतक-याने शेत लावले. शेताला हवा तसा पाऊस, पाहिजे तसे हवामान. ऋतुचक्रच त्याच्या ताब्यात ना ! कधी नव्हे तसे अभूतपूर्व पीक. वा-यावर धान चौफेर डोलताहे.
शेतक-याने कापणी करायचे ठरविले. कापणी सुरू झाली. बघतो तर काय, कणसात आत दाणाच भरलेला नाही. शेतकरी लागला रडायला. त्याने देवाचा धावा केला. देव प्रकट झाला. शेतक-याने आपली व्यथा सांगितली. देव हसला आणि म्हणाला, " वत्सा, कष्ट केल्याविना फळ मिळते का कधी ? हातोडीचे घाव सोसल्याविना देव बनतो का कधी ? अागीत होरपळल्याशिवाय सोने चकाकते का कधी ? बेटा संघर्ष हेच जीवन आहे. "

No comments:

Post a Comment