१४६ संघर्ष हेच जीवन
एके वर्षी पाऊस कमी पडला. शेतक-याला बराच फटका बसला. राग आला त्याचा देवाचा. त्याने देवाला प्रसन्न करायचे ठरविले. तो तप करायला लागला.
देव प्रसन्न झाला. ' भक्ता काय पाहिजे ते माग. ' देव म्हणाला. शेतक-याने हुशारी दाखविली. ' देवा मला ऋतुचक्र दे. ' तो म्हणाला.
देव उद्गारला, " तथास्तु "
पुढील वर्षी शेतक-याने शेत लावले. शेताला हवा तसा पाऊस, पाहिजे तसे हवामान. ऋतुचक्रच त्याच्या ताब्यात ना ! कधी नव्हे तसे अभूतपूर्व पीक. वा-यावर धान चौफेर डोलताहे.
शेतक-याने कापणी करायचे ठरविले. कापणी सुरू झाली. बघतो तर काय, कणसात आत दाणाच भरलेला नाही. शेतकरी लागला रडायला. त्याने देवाचा धावा केला. देव प्रकट झाला. शेतक-याने आपली व्यथा सांगितली. देव हसला आणि म्हणाला, " वत्सा, कष्ट केल्याविना फळ मिळते का कधी ? हातोडीचे घाव सोसल्याविना देव बनतो का कधी ? अागीत होरपळल्याशिवाय सोने चकाकते का कधी ? बेटा संघर्ष हेच जीवन आहे. "
No comments:
Post a Comment