Saturday, August 24, 2013

१११. हा मार्ग सोडून दे .

                        कथा विवेकानंद - १११

     स्वामी विवेकानंदांचे काही बालमित्र तारुण्यात पाय टाकताच वाईट मार्गाला लागले होते . चुकीच्या गोष्टी करण्यासाठी वाईट मार्गाने पैसा मिळवत होते . आपल्यासारखे इतरांनाही त्या मार्गात चलाखीने ओढत होते . 
     अशीच एक संध्याकाळ . नरेंद्र परिस्थितीने गांजलेला . मित्रांनी त्याला एका बागेत नेले . कोलकात्याच्या बाहेरील एका निवांत जागी असलेली भलीमोठी बाग . गाणे, बजावणे,  नाचणे सुरु झाले . धुंदी, बेहोशी पसरू लागली . 
     थोड्या वेळाने नरेंद्र कंटाळला . मित्रांनी त्याला मागच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगितले . तो खोलीत गेला आणि ताणून दिली . 
     एका वेगळ्याच आवाजाने नरेंद्र जागा झाला . त्याच्या जवळ एक युवती उभी होती . तिला मित्रांनीच पाठविले होते . नरेंद्र जागा झाल्याबरोबर तिने आपले मोहपाश टाकायला, आपला हेतू उघड करायला सुरुवात केली . नरेंद्र बधत नाही हे पाहून ती अंगचटीला यायला लागली . 
     नरेंद्र एकदम उठला . कडक शब्दात तो तिला म्हणाला, ' माफ करा . मला आता जायलाच हवे . असे आयुष्य घालविणे हे पाप आहे . हा मार्ग सोडून दे . परमेश्वर आपले भले करो . '  


Friday, August 23, 2013

११०. परमेश्वराचा धावा कर .

                     कथा विवेकानंद - ११०

     इंद्रियनिग्रह हा साधुत्वाचा एक प्रमुख गुणधर्म आहे . संन्यास धर्माची दिनचर्या पाळणे तसे बरेच कठीण . हे नियम यती ब्रह्मचर्याच्या जोरावर पाळत असतो . आपल्या बहिर्मुखी इंद्रियांना अंतर्मुखी करीत त्यांवर विजय मिळवीत असतो . 
     नरेंद्र व मित्र बसले होते.  ग़प्पा चालल्या होत्या . एकाने फिरायला जायची टुम काढली . सगळे फिरायला निघाले . त्या मित्राने सगळ्यांना एका विशिष्ट जागी नेले . त्या ठिकाणी पूर्वी ठरल्याप्रमाणे एक सुंदर स्त्री आली . ती नरेंद्र बरोबर बोलू लागली . मित्र एकएक करून काढता पाय घेऊ लागले . 
     ती स्त्री नरेंद्राला म्हणाली, ' तुझ्या कुटुंबाची झालेली अन्नान्न दशा मला बघवत नाही . तू माझा स्वीकार करावास . मी माझी सगळी संपत्ती तुला देत आहे . आपली पत्नी म्हणून माझा स्वीकार कर . '
     ' बालिके, तू  इतके दिवस या देहासाठी खूप काही केलेस . पुरे ते आता . काही दिवसांनी तू मरणाला सामोरी जाणार आहेस . त्यानंतरच्या प्रवासासाठी काही तरतूद केली आहेस का ? चल, आता हा क्षुल्लक विचार बंद कर आणि परमेश्वराचा धावा कर . ' 



Monday, August 19, 2013

१०९. व्यसने मित्रपरीक्षा

                           कथा विवेकानंद - १०९

     नरेंद्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता . घरी लक्ष्मी पाणी भरत होती . वडिलांचे निधन झाले आणि भुवनेश्वरीदेवींच्या संसाराला जणू कुणाची दृष्टच लागली . महिन्याला एक हजार रुपये त्या काळी खर्च करणारी आई अन्नाला महाग झाली . 
     नरेंद्रचे घर सुखवस्तू असल्यामुळे साहजिकच त्याचे अनेक मित्र श्रीमंत होते . पण त्यांनी कधी नरेंद्रच्या घरची चौकशी केली नाही . तो खातो काय, पितो काय ? घरी कोण कमवत असेल ? काहीच चौकशी केली नाही. 
     एके दिवशी गप्पाटप्पा झाल्या.  नेहमीप्रमाणे सगळे जायला निघाले . दोघे मित्र मात्र मागे रेंगाळू लागले . नरेंद्रच्या आसपास घुटमळू लागले . बाकीचे निघून जाताच त्यांनी नरेंद्राला विचारले, ' बिलू , आज तोंड उतरलेले का ? आजारी आहेस का ? '
      नरेंद्र म्हणाला, ' नाही रे ! ' 
     ' मग जेवलाबिवला नाहीस का ? ' मित्रांनी म्हटले . 
     नरेंद्र गप्प राहिला . 
     मित्रच ते . त्यांनी दुसरीकडे गपचुप चौकशी केली . नरेंद्रच्या घरची माहिती काढली . काही दिवसानीच भुवनेश्वरीदेवींना काही पैसे निनावी मिळाले . व्यसने मित्रपरीक्षा म्हणतात न ती हीच . 


Tuesday, August 13, 2013

१०८. मित्राने जेवायला बोलाविलेय .

                           कथा विवेकानंद - १०८

     दुपारची वेळ . सकाळीच बाहेर पडलेला नरेंद्र घरी परतला होता . नन्नाचा पाढा ऐकत . चपला झिजल्या होत्या . पायात पेटके आले होते . भूक तर सपाटून लागली होती . मात्र नोकरी कोणीही देत नव्हते . बहुतेक ठिकाणी शिक्षण जास्त म्हणून तर काही ठिकाणी गरज नाही म्हणून . नकारघंटा  सतत वाजत होती . 
     नरेंद्राने स्वयंपाक घरात डोकावले . डब्याच्या तळाशी थोडेशेच तांदूळ दिसत होते . म्हणजे आजही सर्वांना अर्धपोटीच राहायचे होते . ओठांवर  उसने हसू आणीत पोट भरलेले दाखवायचे होते . 
     नरेंद्रच तो . क्षणभर विचार केला त्याने . बस्स ! ' आई, ए आई ! 'त्याने आईला हाक मारली . भुवनेश्वरीदेवी धावत आल्या . नोकरी मिळाल्याची बातमी असेल कदाचित . त्या लगबगीने आल्या . नरेंद्र म्हणाला, ' आई, आज मी जेवायला नाही हा . तो माझा मित्र आहे ना ! त्याने आज जेवायला बोलाविले आहे . हा बघ निघालोच . '

     

Sunday, August 11, 2013

१०७ . क्रूर थट्टा वाटत आहे .

                    कथा विवेकानंद - १०७ 

     नरेंद्रच्या वडिलांचे निधन झाले . आय बंद पडली . खायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला . दिवसभर हादडून गप्पाष्टकात मग्न असलेल्या आप्तेष्टांनी विनाविलंब घर सोडले . छोटी कच्ची बच्ची असलेल्या भुवनेश्वरीदेविंकडे सगळ्यांनी पाठ फिरविली . ज्यांची देण्याची ऐपत होती त्यांनीही पाठ करणेच पसंत केले . 
    नरेंद्र नोकरीसाठी फिरायला लागला . सगळीकडे नकारघंटा . नोकरी मिळाली तर ती मनपसंत नसे . उन्हात फिरून फिरून पायाला फोड आले . खूप दमलेला असताना विश्रांतीसाठी सावलीत पडलेला असताना दोन मित्र जवळ आले . नरेंद्राची स्थिती बघून देवाचे भजन गायला लागले . गीताचा सारांश होता, ' देवाच्या प्रत्येक श्वासातून कृपेचे मेघ वहात आहेत . 
     नरेंद्र रागाने म्हणाला, ' गप्प बस ! तुझा जीव भुकेने कासावीस झाला आहे काय ? अरे, पोटभर अन्न खाऊन, चांगले कपडेलत्ते घालून, पंख्याचा वर खाणाऱ्यासाठी ही गोड कल्पना आहे . कधीकाळी ही कल्पना मलाही गोड वाटली होती . आज मात्र क्रूर थट्टा वाटत आहे . '





Saturday, August 10, 2013

१०६ . मस्त मांसाहारी बेत !

                      कथा विवेकानंद - १०६

     नरेंद्र लहानपणी अत्यंत खोडकर होता . विविध प्रकारचे प्रयोग तो करून पहात असे . मनाला पटलेली गोष्ट तो बिनदिक्कत करीत असे . निधडेपणा हा त्याचा गुणविशेष होता .
     नरेंद्राची आई कट्टर वैष्णव . घरी तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्न मिळत नसे . जेवण पूर्ण शाकाहारी . कांदा वर्ज्य . फुलकोबी सारखी भाजीही घरात शिजत नसे . कारण ती विदेशी आहे . काही प्रसंगी शेण सुद्धा खावे लागत असे .   
     आई व भावंडे नातेवाईकांकडे चालली होती . गप्पागोष्टी, चिडवाचिडवी, मजा करीत त्यांचा प्रवास चालू होता .  दुपार झाली . एका नातेवाईकाकडे ती थांबली . त्या दिवशी त्या घरी मस्त मांसाहारी बेत होता . चुलीवर मांस रटरटत होते . 
     नरेंद्र मांस हादडत असे . त्या दिवशी तर त्याची चंगळच होती . मुले जेवायला बसली . छोटा भाऊ महेंद्र जेवणाला स्पर्श करेना . मग काय ! नरेंद्राने बळजबरीने त्याचे तोंड उघडले . मांस तोंडात कोंबले नि पाठीत धुमके घालायला सुरुवात केली . धुमके थांबले मांस महेंद्रच्या पोटात गेले तेव्हा !  

१०५. मी केस कापणार नाही .

                       कथा विवेकानंद - १०५

     स्वामी विवेकानंदांचा जन्म खानदानी बंगाली कुटुंबात झाला . घरी लक्ष्मी पाणी भरत होती . त्या काळी प्रतिष्ठित माणसे केस कापायला, दाढी करायला न्हाव्याकडे जात नसत . न्हावी त्यांच्या घरी येत असे . बंगालात त्या काळी ती प्रथा होती . 
     स्वामीजी संन्याशी बनले . मग पुढे आपली दाढी आपणच करायची सवय त्यांनी लावून घेतली . आश्रमात ते आपल्या हातानी दाढी करीत . आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हि दाढी ते आरसा न वापरता करीत असत . आरसा वापरूनही आपला चेहरा कापून घेणाऱ्याना आज हे आश्चर्य वाटेल . 
      स्वामीजी अमेरिकेत गेले . दाढी भरपूर वाढलेली . ती कापून घ्यावी म्हणून ते एका सलूनमध्ये शिरले . आपली पाळी आल्यावर त्यांनी  न्हाव्याला दाढी कापायला सांगितले . न्हाव्याने चक्क नकार दिला . ' मी काळ्या माणसाचे केस कापणार नाही . ' तो म्हणाला . वर्णद्वेषाने काळवंडलेल्या त्या अमेरिकेतील त्याचे पुढचे विधान होते . ' मी तुमचे केस कापले तर नंतर एकही अमेरिकन या दुकानात पाय ठेवणार नाही . ' 

१०४ . भजी खा ! भजी !

                       कथा विवेकानंद - १०४ 

     माणसाच्या शेवटच्या दिवसात त्याच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . त्याला बालपणीच्या गोष्टी पुन्हा कराव्याश्या वाटतात . तसे तो करतोही . एके परीने अज्ञाताच्या दिशेने चाललेला तो त्याचा उलट प्रवासही असतो .   
     स्वामीजी त्या दिवसात मठात रहात होते . एके दिवशी मोठ्याने ते सर्वांना बोलावू लागले . ' अरे, चला बघू ! इकडे या ! मी जे जे साहित्य  सांगतो ते ते आणून द्या बघू ! बघता काय ? अरे आज मी भजी करणार आहे भजी ! आणा पाहू , डाळीचे पीठ, तेल, मीठ, कढई .... 
    स्वामीजींनी सांगितले ते सामान शिष्यांनी आणले . बसायला चौरंगही आणून दिला . स्वामीजी तयारीला लागले . आपली लुंगी त्यांनी गुडघ्यापर्यंत उचलून वर खोवली . चौरंगावर बैठक मारली . भज्यांच्या पिठाची ते तयारी करू लागले .  
     चळ चुळ, चळ चुळ आवाज येऊ लागला . फुलुरी तयार होऊ लागली . स्वामीजी लहान मुलासारखा मोठमोठ्याने आरडाओरडा करीत शिष्यांना बोलावू लागले . ' चला या , भजी खा ! गरमागरम भजी खा ताजी ताजी ! स्वामीजी तेव्हा अस्सल भजीवाल्यासारखे दिसत होते .  
      

Friday, August 9, 2013

१०३. पकडून दाखवा ना .

                     कथा विवेकानंद - १०३ 

     नरेंद्राला मोठ्या बहिणी दोन . हारामणी व स्वर्णमणी . मोठ्या बहिणी असणे यासारखे दुसरे सुख नाही . घरातल्या कोणत्याही कामाची चिंता नाही आणि चिडवायला जिवंत खेळणे हाताशी . नरेंद्राची चंगळ असे . 
     नरेंद्र सातत्याने या बहिणींची खोड्या काढी . इतक्या, कि त्या वैतागून जात . नरेंद्राला पकडायला धावत . नरेंद्र  मग सुसाट धावत सुटे . पळापळीचा खेळ बराच वेळ झाला, बहिणी थकल्या कि मग तो आतल्या खोलीत पळे . 
     त्या खोलीत बरेच अडगळीचे समान पडलेले असे . त्या सामानाच्या आत खोलवर शिरे . तिथून मग बहिणींना वाकुल्या दाखवी आणि आह्वान देई . ' या आणि पकडून दाखवा . ' नरेंद्राला पकडणे शक्य नसे . त्या चिडत. हा मग गोड आवाज काढी आणि पुन्हा म्हणे,  ' याना आणि पकडून दाखवा ना . ' 

१०२. किटली शुद्ध रुप्याची !

                     कथा विवेकानंद - १०२ 

      विद्यमान भारताच्या उत्थानाची बीजे स्वामी विवेकानंदांनी आपल्या  हयातीत लावली . अज्ञानाच्या गर्तेत खोल खोल बुडत चाललेल्या भारताला पुनरुत्थानाच्या दिशेने कार्यरत केले . 
     स्वामी विवेकानंदांनी मोठेपणी ज्या ज्या गोष्टींना हात लावला त्या गोष्टींचे सोने केले . मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात . त्याचे असे झाले . 
     नरेंद्र आणि दादा म्हणजे भाऊ फिरायला गेले . बाजारात फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना पावणी चाललेली दिसली . पावणी बघत ते उभे राहिले . एका किटलीची बोली सुरु झाली . काळपट रंगाची, धूळ साचलेली पण सुंदर आकाराची किटली . नरेंद्रने ती घ्यायची ठरविली आणि बोली लावली . पाच आण्यावर बोली तुटली अन किटली नरेंद्राची झाली . 
     घरी आल्यावर नरेंद्र किटली साफ करू लागला . जसजशी किटली साफ होऊ लागली तसतशी ती चमकू लागली . रुपेरी रंग फेकू लागली . नरेंद्रने आईला बोलाविले . पाच आण्यात नरेंद्रने आणलेली ती किटली शुद्ध रुप्याची, चांदीची होती . 

Thursday, August 8, 2013

१०१. सोळाएक रोट्या फस्त !

                    कथा विवेकानंद - १०१ 

     नरेंद्रच्या घरी सुबत्ता होती . समवेत मनाचा मोठेपणा होता . भुवनेश्वरीदेवी सढळ हस्ते खर्च करीत असत . पाहुण्यांचा मोठा राबता असलेल्या त्या घराचा खर्चही आज बघितले तर डोळे दिपविणारा ठरतो . 
     त्या काळी स्वस्ताई होती . साधारण माणसाचा पगार तेव्हा पंधरा रुपये महिना असे . अशा वेळी भुवनेश्वरीदेवीचा खर्च महिन्याला एक हजार रुपये होत असे असे . 
     नरेंद्र आणि महेंद्र दोघेही भाऊ मटणाच्या दुकानात गेले . त्या काळी दुकानात डोक्यांची विक्री केली जात नसे . दोघांच्याही डोक्यात एक विचार आला . विनाविलंब त्यांनी तो अमलातही आणला . ते दुकानदाराला म्हणाले, ' दोनचार आण्यात दहाबारा डोकी देशील काय ? ' दुकानदार एका पायावर तयार झाला . 
     दुसऱ्या दिवसापासून घरात रोज अडीच शेर वाटणा भिजू लागला . तो वाटणा आणि दहाबारा डोकी यांची भाजी . शाळेतून यायचे ते थेट भाजीला भिडायचे . उठायचे तेव्हा सोळाएक रोट्या फस्त झालेल्या असायच्या . 

Tuesday, August 6, 2013

९९ . बिलु शांत होत गेला .

                        कथा विवेकानंद - ९९

स्वामी विवेकानंदांच्या पणजीचे नाव राईमणिदेवी बसू . त्यांच्या मुलीचे म्हणजे नरेंद्रच्या आजीचे नाव रघुमणीदेवी . भुवनेश्वरीदेवी हे रघुमणीदेवी यांचे एकमेव अपत्य . 
     रघुमणीदेवी दिसायला सुंदर होत्या . तोच वारसा भुवनेश्वरीदेवीं कडून नरेंद्राला मिळाला . उन्नत भालप्रदेश, विशाल नेत्र आणि तेजस्वी कांती त्याला आई आजी कडून मिळाली . 
     मात्र गडगंज श्रीमंती लाभूनही भुवनेश्वरीदेवींना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या . म्हणून संन्याशी झाल्या नंतर सुद्धा स्वामी विवेकानंद आपल्या आईची काळजी करताना दिसतात. भुवनेश्वरीदेवींनीही नरेंद्राला म्हणजे तिच्या लाडक्या बिलुला लाडाकोडात वाढविलेले दिसते .      अत्यंत खोडकर असलेला बिलू एक दिवस कोणालाही ऐकेना . खूपच मस्ती करू लागला . आईने काय केले ठाऊक आहे ? विहिरीजवळ गेली. थंडगार पाण्याची कळशी भरली . आणि ओतून दिली एकदम बिलुच्या डोक्यावर . एकीकडे ती शिव शिव म्हणू लागली आणि दुसरीकडे बिलु  शांत होत गेला . 

Sunday, August 4, 2013

९८ . संन्यासाचे मूळ आजोबा !

                      कथा विवेकानंद - ९८ 

     नरेंद्रच्या पणजोबांचे नाव राममोहन दत्त . ते सर्वोच्च्य न्यायालयात फारसी कायदेतज्ञ होते . धनसंपत्ती, जमीनजुमला यांनी ते संपन्न बनले . उन्हाळ्यात कोलकात्यात कॉलऱ्याची साथ येत असे . या साथीत वयाच्या केवळ छत्तीसाव्या वर्षी राममोहनांचा मृत्यू झाला . 
     त्यांच्या मुलाचे नाव दुर्गाप्रसाद . तेही अटर्नी कार्यालयात कामाला होते . त्या काळी जमीनजुमल्या वरून भांडणे खूप होत . कोलकात्यातील मोठमोठी घराणी कोर्टकचेरीच्या नादी लागून बरबाद होत असत . 
     एके दिवशी घरात दुर्गाप्रसादांच्या पत्नीचा अपमान झाला . दुर्गाप्रसादना त्याचा राग आला . त्यांनी घराचा त्याग केला . काही दिवसांनी त्यांनी संन्यास घेतला आणि योगी बनले . कधी कधी ते कोलकात्यात येतही  असत . असेच एकदा आले असताना त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले . त्यांनी पुन्हा जाऊ नये असा सर्वांचा हेतू होता . तीन दिवसांनी बघितले तर त्याच्या तोंडातून फेस येत होता .  दार उघडण्यात आले . ते निघून गेले ते पुन्हा आलेच नाहीत . नरेंद्रच्या संन्यासाचे मूळ आजोबा होते . 

Saturday, August 3, 2013

९७ . आद्य शंकराचार्यही मातृभक्त होते .

                        कथा विवेकानंद - ९७ 

     स्वामी विवेकानंद मातृभक्त होते . ते आपली आई भुवनेश्वरीदेवीवर   निरतिशय प्रेम करायचे . नरेंद्र संन्याशी झाला . संन्याशी होणे म्हणजे सगळे भौतिक संबंध तोडून टाकणे. स्वतः चे श्राद्धही स्वतः करणे .  संन्याशी झाल्यावर आपली हि मातृभक्ती त्यांनी लपवून ठेवली नाही . अनेक वेळा ती समाजाने पहिली .  
     दत्तांचे कुटुंब मोठे आणि सुखवस्तू कुटुंब होते . खाण्यापिण्याची सुबत्ता असलेल्या या कुटुंबात पाहुण्यांचा भलामोठा राबिता होता . आल्यागेलेल्यांचा दीर्घ निवास त्या कुटुंबात होत असे . गप्पांचे, गाण्यांचे  फड रंगत . 
     विश्वनाथ दत्तांचे निधन झाले . संपत्तीचा झरा आटला . आणि संपूर्ण नातेवाईकांनी सुंबाल्या केले . छोटी छोटी मुले असलेल्या भुवनेश्वरी देवींना पाण्याचा घोटही कोणी विचारला नाही . तिने स्वतःच्या हिकमतीवर मुलांना लहानाचे मोठे केले . 
     स्वामीजी आश्रमात होते . आश्रमात भुवनेश्वरीदेवी आल्या . आल्या आल्या खालूनच तिने स्वामीजींना हाक मारली . ' बिले ! ओ बिले ! ' स्वामीजी धावत खाली आले . आईशी हळू आवाजात बोलू लागले . सगळ्यांना आश्चर्य वाटले . काहींनी स्वामीजींना विचारलेही . ते म्हणाले, ' अरे, जन्मदात्री आई आहे ती माझी . आणि मीच काय, आद्य शंकराचार्यही मातृभक्त होते . ' 

Friday, August 2, 2013

९६ . संवेदनशीलता

                    कथा विवेकानंद - ९६ 

     स्वामी विवेकानंदांनी संन्यास स्वीकारला . ते आश्रमात राहू लागले . मात्र त्यांनी आपली संवेदनशीलता जपली होती . अनेकांना त्यांच्या या गोष्टीचे आश्चर्य वाटे . 
     एकदा त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला . स्वमिजींना हि बातमी समजली . बातमी ऐकताच ते रडू लागले . संन्याशी असूनही ते रडतात हे बघितल्यावर एकाने उद्गार काढले, ' संन्याशाने असा शोक करणे बरोबर नव्हे . ' 
     स्वामीजी म्हणाले, ' असे कसे ? मला मन नाही काय ? मी मन मारून टाकू काय ? उलट मला वाटते संन्याशी सामान्य माणसापेक्षा अधिक हळुवार मनाचा असला पाहिजे . संवेदनशील असला पाहिजे . मन दगडापेक्षा कठोर करणारा संन्यास धर्म मी अजिबात मानीत नाही . ' 


Thursday, August 1, 2013

९५. तू पथ्य पाळायचे .

                        कथा विवेकानंद - ९५

     स्वामीजी आजारी होते . आपला अंतिम समय जवळ आला आहे हे त्यांना समजले होते . पण सर्वांच्या इच्छेखातर त्यांनी डॉक्टरी उपचारांना अनुमती दिली होती . 
     शिष्यांनी प्रसिद्ध वैद्य सेनगुप्ता यांना बोलाविले . त्यांनी स्वामीजींची नाडीपरीक्षा केली . तपासणी केली आणि कठीण पथ्य सांगितले . ' पाणी व मीठ वर्ज्य . २१ दिवस ' 
     स्वामीजींना मसालेदार पदार्थ आवडत असत . ते तंबाखू खायचे . दिवस उन्हाळ्याचे . पथ्य पार कसे पडायचे ? स्वामीजींनी पथ्य पाळायचे ठरविले . पुढे एकदा बोलताना स्वामीजी म्हणाले, ' वास्तविक मनाने शरीराला हुकुम केले पाहिजेत . पण अनेकदा होते उलटेच . शरीरच मनाला हुकुम सोडते . आणि मन तो मानते . मी मात्र शरीराला बजावले . तू पथ्य पाळायचे . आणि मजा म्हणजे शरीराने ती आज्ञा मानली . ' 
    या क्षणी स्वामीजींच्या शरीरात ३३ रोगांचा निवास होता .