Sunday, June 30, 2013

६७ .सामान्यांच्या मुक्तीसाठी झोकून दे !

                       कथा विवेकानंद - ६७ 

     स्वामी विवेकानंद दीक्षा घेण्यासाठी आलेल्या युवकांना दीक्षा देत . पण त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधणे स्वामीजींना आवडत नसे . समाज गलितगात्र असताना स्वतःची मुक्ती हे त्यांना स्वार्थी वाटे . आधी समाजाची ह्या अवनतीतून मुक्ती मग स्वतःसाठी असे त्यांचे सूत्र होते . 
     स्वामीजीकडून दोन तरुणांनी दीक्षा घेतली . त्यांची नावे ठेवण्यात आली विरजानंद आणि प्रकाशानंद ! यथावकाश स्वामीजींनी त्यांना ढाक्यास जायला सांगितले . स्वामी रामकृष्णाच्या शिकवणुकीचा प्रचार करण्यास सांगितले . ते का कुं करायला लागले . 
     ' आम्हाला काहीच ज्ञान नाही. आम्ही काय सांगणार ? असे ते म्हणू लागले. आम्ही आणखी थोडी खडतर तपः श्चर्या करू . मुक्तीलाभ घेऊ. मग ढाक्यास जाणे योग्य होईल .  '
     स्वामीजी रागावले, " वत्सा, तू स्वतः च्या मुक्तीची धडपड केलीस तर नरकात जाशील . हि स्वार्थी इच्छा सोडून दे . जनसामान्यांच्या मुक्तीसाठी झोकून दे ! "

६६ .कोणाही बरोबर मी जेऊ शकतो .

                     कथा विवेकानंद - ६६ 

     स्वामी विवेकानंदावर खेत्री संस्थानाच्या महाराजांची खूप श्रद्धा होती .  श्री . जगमोहनलाल त्यावेळी संस्थानाचे दिवाण होते . स्वामीजी संस्थानात आले की, स्वामीजी, महाराज आणि जगमोहनलालजी यांच्यात विविध विषयांवर चर्चा होत.ऐकणाऱ्याना ती एक बौद्धिक मेजवानीच असे . 
     असेच एकदा स्वामीजी संस्थानात आले होते . बोलता बोलता जगमोहनलाल म्हणाले, ' स्वामीजी तुम्ही असे कसे ? स्वतःला तुम्ही हिंदू संन्यासी म्हणवून घेता, आणि मुसलमानाकडे भोजन करता ? म्लेंच्छांचा हात लागला तर तुम्ही हिंदू कसे राहणार ?
     स्वामीजींना राग आला . ते तीव्र शब्दात म्हणाले, " मी संन्याशी आहे . ' करतल भिक्षा तरुतल वास ' अशी आमची पद्धती . मला कसले लागतात तुमच्या रूढी आणि रीतीरिवाज . ज्ञानदान करणारा शिक्षक व संडास साफ करणारा भंगी मला सारखेच . कोणाही बरोबर मी जेऊ शकतो . "


Saturday, June 29, 2013

६५. कार्याचा सन्मान झालाच पाहिजे .

                      कथा विवेकानंद - ६५ 
                          कार्याचा सन्मान झालाच पाहिजे .


     बोलता बोलता स्वामीजी एका सामाजिक कार्यकर्त्याची प्रसंशा करू लागले . त्याने उभे केलेले काम, त्यासाठी केलेले कष्ट, त्या कामामागचा त्याचा विचार ते सांगू लागले . त्या कामातून झालेल्या सामाजिक बदलावरही त्यांनी भाष्य केले . 
     तेथे असलेल्या एका गृहस्थाला ते आवडले नाही . आपली नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला, ' स्वामीजी, पण तो माणूस तर तुम्हाला अजिबात मानीत नाही . '
     स्वामीजी म्हणाले, ' अरे असे कसे ? त्याने मला मानले म्हणजे त्याचे काम श्रेष्ठ असे कुठे आहे ? तो श्रेष्ठ आहे, तो त्याने चांगले कार्य केले म्हणून ! त्यासाठी मी त्याची प्रसंशा केली . '
     चांगले काम मग ते कोणीही का करेना, त्यामुळे देशाची उन्नती होते, आध्यात्मिक प्रगती होत असते . त्या कार्याचा सन्मान झालाच पाहिजे .  

Thursday, June 27, 2013

६३. आईवर प्रेम करा

                    कथा विवेकानंद - ६३       
     संन्याशी म्हणजे संपूर्ण विश्वावर प्रेम करणारा . प्रांत, देश, भाषा वगैरे त्याला लागत नाही . तो नेहमी जागतिक पातळीवर चिंता करतो . स्वामी विवेकानंदांनी असा विचार कधीही केला नाही . 
     स्वामीजी देशभ्रमणात होते . एके ठिकाणी त्यांना एक साधू महाराज भेटले . वार्तालाप करता करता ते म्हणाले, ' साधूला कोणतीही बंधने असू नयेत . त्याने हे विश्वाची माझे घर असा भाव बाळगावा . देशाची नव्हे केवळ जगाच्या कल्याणाची चिंता करावी . '
     स्वामी विवेकानंदांना राग आला . तीव्र शब्दात ते साधूला म्हणाले, ' असे कसे होईल . जो आपल्या आईला पोसू शकत नाही . तिच्या कल्याणाची चिंता करु शकत नाही . तो दुसऱ्याच्या आईला कसा पोसणार ? ज्याच्या मनात स्वतःच्या आईविषयी प्रेम नाही तो दुसऱ्याच्या आईवर प्रेम कसे करणार ? ' 




६२. मनःशांती अवश्य लाभेल

                   कथा विवेकानंद - ६२ 

     स्वामी विवेकानंद आध्यात्मिक पुरुष . त्यात योद्धा संन्याशी . साहजिकच अनेक तरुण त्यांना भेटण्यास, त्यांचे मार्गदर्शन घेण्यास येत . पण त्यांचा  सेवाभावाचा पैलू अनेकांच्या लक्षात येत नसे . 
     असाच एक तरुण त्यांच्याकडे आला . अनेक ग्रंथांचे वाचन केलेला, विविध साधना केलेला असा . तो स्वामीजींना म्हणाला, ' स्वामीजी मी अनेक साधना केल्या . दारे बंद करून स्वतःला कोंडून घेतले . तासनतास बसलो पण शान्तिलाभ काही होत नाही . माझे काय चुकतेय ? मी काय करावे ?
     स्वामीजी हसले आणि म्हणाले, ' बेटा, दारे बंद नाही, दारे उघडी कर . उठ, खोलीतून बाहेर पड . आजूबाजूला बघ . अनेक गोरगरीब तुला दिसतील, त्यांच्यासाठी धान्य गोळा कर . अनेक आजारी रुग्ण असतील, त्यांना औषधोपचार कर . खुपजण अशिक्षित भेटतील, त्यांना साक्षर कर . जनताजनार्दन म्हणतात . समाज हाच देव आहे . त्याची सेवा कर . तुला मनःशांती अवश्य लाभेल . ' 

Wednesday, June 26, 2013

६४ . तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर .

                       कथा विवेकानंद - ६४ 
                तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर .

     स्वामीजी प्रवासात अनेक जणांच्या घरी मुक्काम करीत . मुक्कामात लोक त्यांना प्रश्न विचारीत . आपल्या शंकांचे निरसन करून घेत . 
     अशाच एका मुक्कामी नटकृष्णानी स्वामीजींसमोर आपली समस्या ठेवली . ते स्वामीजींना म्हणाले, ' मनाला समाधान मिळावे म्हणून गेले कित्येक महिने मी संध्या व गायत्री जप नियमित करीत आहे . पण म्हणावे तसे समाधान मिळत नाही . काय होते काही कळत नाही . '
     स्वामीजी म्हणाले, ' नटकृष्ण, नुसते घोकून किंवा पाठ करून काहीही मिळत नाही . जे काय मिळवायचंय ते आपल्याला स्पष्ट पाहिजे . जी भाषा आपल्याला कळत नाही त्या भाषेतून प्रार्थना करून काही उपयोग नाही . तू तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर . तुला ईश्वर निश्चित प्राप्त होईल . '  

६१ .दणदणीत गुण पडतील .

                   कथा विवेकानंद - ६१ 

     स्वामी विवेकानंद तेव्हा विद्यार्थी होते . परीक्षेचे दिवस होते . पहाटे उठून सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसत . दोनेक तास, अभ्यास उजळणी करून परीक्षेला जात . 
     असाच एक दिवस होता . नरेंद्र पहाटे उठला आणि गायला लागला . आपल्या दमदार आवाजात त्याने गीते म्हणायला सुरुवात केली . त्याचे सगळे साठी जमले . त्या सुमधुर गायनाचा आस्वाद घेऊ लागले . गीतामागून गीते नरेंद्र गात होता . अगदी तन्मय होऊन, जगाचे भान विसरून . 
     दोनेक तासानी एक मित्र भानावर आला . परीक्षेची आठवण होऊन तो नरेंद्राला म्हणाला, ' अरे, परीक्षेची आठवण आहे का ? '
     " आहे तर ! म्हणूनच हि साधना चालली आहे . " नरेंद्र म्हणाला . "  मेंदूची साफसफाई ! नव्या गोष्टी घाईघाईने कोंबत गेलो तर आहे ते आणि नवे यांचा गोंधळ व्हायचा . यापेक्षा शरीर आणि मन शांत, आनंदी ठेवले म्हणजे मागचा अभ्यास आठवेल . भरभर लिहिता येईल आणि दणदणीत गुण पडतील . " 

  

Tuesday, June 25, 2013

६० . हा मुलगा पुढे फर्डा वक्ता होईल .

                         कथा विवेकानंद - ६० 

     बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात . त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते . इंग्रजी स्वभावानुसार शाळेत इंग्रजी भाषा सक्तीची होती . एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर बिलेले घोषणा केली की, ' ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनविले, त्या इंग्रजांची भाषा मी मुळीच शिकणार नाही .' वडील प्रख्यात वकील आणि आईही धार्मिक प्रवृत्तीची ! दोघांनीही मार्ग काढला . बिले शिकायला लागला . 
     मेट्रोपोलीटन इन्स्टिट्युट मध्ये नरेंद्रनाथ शिकत होता . शाळेत प्रमुख समारंभ होता . प्रमुख पाहुणे होते बंगालातील मोठे नेते श्री . सुरेंद्रनाथ बेनर्जी . समारंभात विद्यार्थ्यांमधून कोण भाषण करणार ? शिक्षकांमध्ये चलबिचल चालली . 
     शेवटी नरेंद्राची निवड करण्यात आली . कार्यक्रमातील त्याचे भाषण अतिशय उत्कृष्ट झाले . सुरेंद्रनाथ बेनर्जी तर एकचित्ताने ऐकत होते . कार्यक्रम झाल्यावर त्यांनी नरेंद्राला जवळ बोलाविले . त्याच्या पाठीवरून हात फिरविला . ते म्हणाले, ' अभिनंदन ! छान बोललास . असाच बोलत राहा. ' शिक्षकांशी बोलताना ते म्हणाले. ' हा मुलगा पुढे फर्डा वक्ता होईल . ' 

५९ . इंग्रजांची भाषा मी शिकणार नाही .

                     कथा विवेकानंद - ५९ 

     स्वामी विवेकानंदांना लहानपणी बिले या लाडक्या नावाने हाक मारत .  बिले खूप खोडकर होता . खोड्या केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे . मात्र त्याच्या या खोड्या कधीही दुसऱ्याला दुखावणाऱ्या नसत . त्यामुळेच तो सर्वांचा लाडका बनला होता . 
     बिले सहा वर्षांचा झाला . कधीही एका जाग्यावर स्थिर न बसलेला हा वर्गात एका जागी कसा बसणार ? पण शाळेत तर घालायला हवा . शेवटी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत त्याचे नाव घालण्यात आले . 
     बिले आनंदाने शाळेत जायला लागला . त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते . शाळेत इंग्रजी भाषा सक्तीची होती . एके दिवशी घरी आल्यावर बिलेले घोषणा केली, ' ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनविले, त्या इंग्रजांची भाषा मी मुळीच शिकणार नाही .' 

Monday, June 24, 2013

५८. भाविकांची सेवा

                      कथा विवेकानंद - ५८ 

     स्वामी विवेकानंदांनी एका युवकाला संन्यासदीक्षा दिली . त्याचे नाव ठेवले   कल्याणानंद . समारंभ पार पडल्यावर स्वामीजींनी विचारले, ' तू आता माझा शिष्य झालास . मी गुरु . बोल, गुरुदक्षिणा काय देणार ? '
     शिष्यही ताकदीचा होता . तो म्हणाला, मीच मला तुम्हाला अर्पण केलेय . माझ्याकडून काय गुरुदक्षिणा पाहिजे ती सांगा . तुम्ही सांगाल ते ऐकेन . ' 
     स्वामीजी म्हणाले , ' तर मग लवकरच तू इथून निघायचे . मी थोडे पैसे देईन . ते घेऊन हरिद्वार गाठायचे . तेथे एक झोपडी बांधायची . आणि तिथे रहायचे . पुन्हा इकडे यायचे नाही . '
     स्वामीजी पुढे म्हणाले, " हरिद्वार हे आमचे धर्मस्थान . रोज हजारो भविक तेथे जातात . प्रवासाच्या दगदगीत ते आजारी पडतात . कोणाच्याही आश्रयाला, रस्त्यावर ते पडलेले दिसतात . योग्य उपचार न झाल्यामुळे त्यातील अनेकजण दगावतात . या असहाय्य भाविकांची सेवा कर . त्याच्यावर औषधोपचार कर . त्यांना आपले मानून पूर्ण काळजी घे . हेच तुझे भावी कार्य . मला विसरून जा . " 
      हरिद्वारला गेलेल्या कल्याणानंदांची आणि विवेकानंदांची हि शेवटची भेट !  

५७ . मठाची जमीन विकू !

                       कथा विवेकानंद - ५७ 

     मोठी माणसे भाऊक असतात . दुसऱ्याच्या वेदनांनी ती आहत होतात . ते दुखः नाहीसे व्हावे म्हणून ती प्रयत्न करतात . आणि म्हणून ती मोठी माणसे ठरतात . 
     कोलकात्यात प्लेगाची साथ आली . मोठ्या प्रमाणावर माणसे मरू लागली . साथीचे स्वरूप उग्र होऊ लागले . स्वामींनी रुग्ण सहायता केंद्र उघडले . मोठ्या संख्येने रुग्ण तेथे येऊ लागले . त्याची सेवा सुश्रुषा होऊ लागली . 
     लक्षात असे आले की बंगालात इतरही ठिकाणी अशा केंद्रांची जरुरी आहे . लोकांची मागणी आहे . केंद्रे सुरु करणे शक्य आहे, पण यासाठी मोठ्या संख्येने निधी हवा आहे . तो कुठून मिळणार ? 
     बैठकीत स्वामिजींसमोर विषय आला . करायचे काय ? स्वामीजी एकदम म्हणाले, ' आपण मठासाठी घेतलेली जमीन विकू आणि पैसा उभा करू ! ' 
     सगळे स्तब्ध झाले . बेलूर मठ हे स्वामीजींचे मोठे स्वप्न होते . आणि त्यासाठी ती जमीन घेतली होती . स्वामीजींनी ती विकायची ठरविली . शेवटच्या क्षणी पैसा उपलब्ध झाला आणि जमीन विकायचे राहिले .  

Sunday, June 23, 2013

५६ . सेवा सुश्रुषा !

                   कथा विवेकानंद - ५६ 

     स्वामी विवेकानंद प्रवासात एका यजमानांच्या घरी उतरले होते .  फिरायला गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक माणूस झोपलेला दिसला . वेदनांनी तो कण्हत होता . स्वामीजींनी जवळ जाऊन बघितले . तो माणूस आजारी होता . अतिसाराने त्याची दशा झाली होती . तो चालूही शकत नव्हता . 
     स्वामीजींनी त्याची सुश्रुषा करायचे ठरविले . पण त्याला नेणार कोठे ? यजमानाच्या घरी नेले, आणि त्यांना वाईट वाटले तर ! थोडा विचार केला आणि स्वामीजी त्याला घेऊन यजमानाच्या घरी आले . जेथे स्वामीजी स्वतः उतरले होते . 
     स्वामीजींनी त्याची योग्य ती सेवा सुश्रुषा केली . तो बरा झाला . यजमानांनाही   खूप बरे वाटले . स्वमिजीच्या सेवाभावनेने सगळे प्रसन्नचित्त झाले .  

Saturday, June 22, 2013

५५ .शरीर शुचिर्भूत करतोय !

                          कथा विवेकानंद - ५५ 

     स्वामी विवेकानंद आपल्या विश्वप्रसिद्ध भाषणानंतर चार वर्षे युरोपात राहिले . हिंदू धर्माची यथार्थ ओळख त्यांनी पाश्चिमात्य लोकांना करून दिली . आपल्या ओजस्वी वाणीने विविध विषयांवर व्याख्याने दिली . रामकृष्ण मठांची स्थापना केली . 
     स्वामीजी भारतात जायला निघताना एकाने प्रश्न केला, ' वैभवशाली युरोपात आपण चार वर्षे राहिलात . आता भारतात जाताना कसे वाटतेय ? '
     " भारतावर माझे प्रेम तर पूर्वीपासून आहे . आता युरोपात आल्यापासून मात्र ते कित्येक पटीने वाढलेले दिसते . ती भूमी आता मला पवित्रतम आहे . तिथला कणन कण आता मला देवतास्वरूप आहे . "
      स्वामीजी भारतात आले . बोट बंदराला लागली . ते किनाऱ्यावर उतरले . कितीतरी वर्षांनी झालेले मायभूमीचे दर्शन ! स्वामीजींना उचंबळून आले . ते धावत धावत किनाऱ्यावर उतरले . एकदम वाकले आणि मुठभर भारतीय माती काढून कपाळाला लाऊ लागले . अंगावर उधळू लागले . 
      लोकांनी स्वामीजींना विचारले, ' स्वामीजी हे काय करताय ? '
स्वामीजी म्हणाले, " गेली अनेक वर्षे मी त्या भोगभूमित होतो . हे शरीर अपवित्र झालेले आहे . ह्या माझ्या पवित्र धुलिकणांनी हे शरीर शुचिर्भूत करतोय ! पवित्र करतोय ! "


Friday, June 14, 2013

५४ . महाराजांनी स्वतः रथ ओढला .

                       कथा विवेकानंद - ५४

     स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले . आपल्या चिरंतन भाषणाने त्यांनी विश्वदिग्विजय केला . काही वर्षे युरोपीय देशात हिंदू धर्माचा प्रसार केला . हिंदू तत्ज्ञानाची कीर्ती दशदिशा फाकविली. आणि ते परतीच्या प्रवासाला लागले . 
     स्वामी विवेकानंदांचे भारतात आगमन झाले . आणि अभूतपूर्व स्वागताने हिंदू जनमानस रोमांचित झाले .जिकडे तिकडे स्वामीजींच्या प्रकट सत्काराचे प्रचंड कार्यक्रम होऊ लागले . 
     स्वामीजी पंबनला आले . पंबनच्या राजवाड्यात त्यांचा मुक्काम होणार होता . राजधानीच्या वेशीवर लोकांचा प्रचंड जमाव जमला होता . विवेकानंदांचे आगमन झाले . स्वामीजींच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जाऊ लागले . 
     वेशीवरून मिरवणूक सुरु झाली . महाराज रथात बसले होते . महाराजांनी  रथ थांबविला . ते पायउतार झाले . स्वामीजींचा रथ ते ओढू लागले . स्वतः रथ ओढत ओढत त्यांनी स्वामीजींना राजवाड्यात आणले .  

Thursday, June 13, 2013

५३ .तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस !

                           कथा विवेकानंद - ५३ 

     अमेरिकेत प्रसिद्धी मिळाल्यावर स्वामीजींना अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली . एका महिला मंडळात स्वामीजींचे भाषण होते . भाषण सुरु व्हायला थोडा वेळ होता . सभागाराशेजारील खोलीत स्वामीजींची बसण्याची व्यवस्था केली गेली . 
     कार्यक्रमाची वेळ झाली . आयोजिका खोलीत आल्या . विवेकानंद डोळे मिटून शांतपणे बसले होते . त्यांनी स्वामींना चलण्याची विनंती केली . स्वामीजी एकदम दचकल्या सारखे उठले. डोळे पुसले आणि दाराकडे जाऊ लागले . 
     एकदम मागे वळले . आरशापुढे जाऊन उभे राहिले . आपला फेटा त्यांनी नीट  केला . आरशात स्वतःला बघितले आणि चालायला लागले . दाराजवळ जाताच पुन्हा मागे वळले . पुन्हा आरशाजवळ गेले .  
आयोजिका हसल्या . म्हणाल्या, ' आज स्त्रियांसमोर व्याख्यान आहे म्हणून काय ? '  
     स्वामीजी हसले, ' अहं ! तसं काही नाही . तुम्ही मला वेळ आहे म्हणालात . मी बसलो आणि समाधी अवस्थेत गेलो . हाक मारल्या बरोबर जागा झालो .  पूर्ण भानावर येण्यासाठी मनाला बजावीत होतो कि, तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस ! तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस ! ' 

Wednesday, June 12, 2013

५२ . धन्यवाद, तुम्ही मला द्यायचे !

                         कथा विवेकानंद - ५२


     अमेरिकेत श्री . जॉन रॉकफेलर नावाचे एक कोट्याधीश होते . त्यांना संपत्तीचा फार गर्व . कोणीतरी स्वामीजींची माहिती सांगितली . आणि ते स्वामीजींना भेटायला गेले . 
     स्वामीजीं काही क्षण त्यांना एकटक बघितले . रॉकफेलरच्या जीवनातील केवळ त्यांनाच ठाऊक असलेल्या काही गोष्टी स्वामीजी सांगू लागले . रॉकफेलरनी आ वासला होता . 
      ' तुमच्याकडे जो पैसा आहे तो वास्तविक तुमचा नाही . तुम्ही त्याचे विश्वस्थ आहात . समाजाच्या सहकार्याने तो तुम्ही मिळविलाय . समाजासाठी दान करा त्याचे . देवानेच हि संधी दिलीय तुम्हाला . ' स्वामीजी उद्गारले . 
     सुरुवातीला जमिनीवर उतरविले, मघाशी खाली बसविले आणि आता अक्षरशः उचलून बाहेर फेकून दिले ! गर्वाचे गाठोडे ! अवाक होऊन निघून गेले रॉकफेलर . 
     काही दिवसांनी हे वादळ पुन्हा आले . अनेक सामाजिक योजनाची धारिका घेऊन आले होते ते . ' बघा किती दानधर्म मी करणार आहे तो . आता मात्र आभार मानायलाच हवे तुम्ही माझे ! ' रॉकफेलर म्हणाले . 
     स्वामींनी कागद चाळले . ते रॉकफेलरना म्हणाले , ' अहं , मी नव्हे ! धन्यवाद, तुम्ही मला द्यायचे ! हि संधी दिली म्हणून ! ' 
     आज रॉकफेलर प्रतिष्ठान दानधर्म करणारे अमेरिकेतील श्रेष्ठ प्रतिष्ठान आहे . 

Tuesday, June 11, 2013

५१ रॉकफेलरचा दंभ उतरला.

                      कथा विवेकानंद - ५१

     धनाढ्य माणसे तशी सणकी असतात . अमेरिकेत श्री . जॉन रॉकफेलर नावाचे एक कोट्याधीश होते . त्यांना कोणीतरी स्वामीजींची माहिती सांगितली . स्वामीजींना भेटण्याचा सल्ला दिला . पण संपत्तीचा थोडासा गर्व असलेल्या रॉकफेलरननी तो सल्ला टाळला . ना धर्माचा ना श्रीमंतही ! कशाला जायचे ?
     का पण कोण जाणे ! एक दिवशी सणक मारली . त्यांनी स्वामीजींचे निवासस्थान गाठले . गाडीतून उतरले आणि ताडताड पावले टाकीत दरवाज्या समोर आले . दरवाज्यासमोर रक्षक उभा . त्या रक्षकाला धडक देत त्यांनी स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला . 
     स्वामीजी पुस्तक वाचत बसले होते . ' या बसा नमस्कार ' म्हणायचे सोडाच स्वामीजींनी बघितले सुद्धा नाही . बेचैन होऊन रॉकफेलर फेऱ्या मारू लागले . काही वेळाने न राहवून ते स्वामीजवळ गेले . 
     ' आलेल्या माणसाचे शब्दाने सुद्धा स्वागत करायचे नाही हि कुठली रीत ? ' रॉकफेलर उद्गारले . 
     ' जिथे खोलीत प्रवेश करताना अनुमती न घेता प्रवेश करत असतात तिथली . ' स्वामीजी म्हणाले . 
     ' आणि बसायला न द्यायचे कारण ? ' रॉकफेलर . 
     ' रक्षकाला ढकलायचे कारण ? ' स्वामीजी . 
     रॉकफेलरचा दंभ उतरला होता . 

Friday, June 7, 2013

५० विशाल हृदयाचे स्वामीजी !

                           कथा विवेकानंद - ५० 

     एकदा स्वामीजी बोलत होते . आपल्या शिष्याला वेदांताचे स्वरूप विशद करून सांगत होते . स्वामी रामकृष्णाचे शिष्य श्री . गिरीशचंद्र घोष तेथे आले . स्वामीजींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले . बराच वेळ झाला आणि स्वामीजी थांबले . 
     थोडा वेळ शांततेत गेला . श्री . गिरीशचंद्र घोष बोलायला लागले, ' स्वामीजी, तुम्ही वेदांताचे जाणकार आहात . आजची आपल्या समाजाची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे . गरिबी, रोगराई, अज्ञान, अशिक्षा, पारतंत्र्य ! ' 
     श्री . गिरीशचंद्र घोष पुढे म्हणाले ,' स्वामीजी यातून सुटण्याचा काही मार्ग वेदांतात आहे काय ? ' 
     श्री . गिरीशचंद्र घोष तत्कालीन भारतीय स्थितीचे वर्णन करीत होते . आणि स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते . सहन होईनासे झाले आणि स्वामीजी उठून दुसऱ्या खोलीत निघून गेले . 
श्री . गिरीशचंद्र घोष उपस्थितांना म्हणाले, ' बघितले का ! केवढ्या विशाल हृदयाचे स्वामीजी तुम्हाला मिळाले आहेत ते . '