Saturday, June 22, 2013

५५ .शरीर शुचिर्भूत करतोय !

                          कथा विवेकानंद - ५५ 

     स्वामी विवेकानंद आपल्या विश्वप्रसिद्ध भाषणानंतर चार वर्षे युरोपात राहिले . हिंदू धर्माची यथार्थ ओळख त्यांनी पाश्चिमात्य लोकांना करून दिली . आपल्या ओजस्वी वाणीने विविध विषयांवर व्याख्याने दिली . रामकृष्ण मठांची स्थापना केली . 
     स्वामीजी भारतात जायला निघताना एकाने प्रश्न केला, ' वैभवशाली युरोपात आपण चार वर्षे राहिलात . आता भारतात जाताना कसे वाटतेय ? '
     " भारतावर माझे प्रेम तर पूर्वीपासून आहे . आता युरोपात आल्यापासून मात्र ते कित्येक पटीने वाढलेले दिसते . ती भूमी आता मला पवित्रतम आहे . तिथला कणन कण आता मला देवतास्वरूप आहे . "
      स्वामीजी भारतात आले . बोट बंदराला लागली . ते किनाऱ्यावर उतरले . कितीतरी वर्षांनी झालेले मायभूमीचे दर्शन ! स्वामीजींना उचंबळून आले . ते धावत धावत किनाऱ्यावर उतरले . एकदम वाकले आणि मुठभर भारतीय माती काढून कपाळाला लाऊ लागले . अंगावर उधळू लागले . 
      लोकांनी स्वामीजींना विचारले, ' स्वामीजी हे काय करताय ? '
स्वामीजी म्हणाले, " गेली अनेक वर्षे मी त्या भोगभूमित होतो . हे शरीर अपवित्र झालेले आहे . ह्या माझ्या पवित्र धुलिकणांनी हे शरीर शुचिर्भूत करतोय ! पवित्र करतोय ! "


No comments:

Post a Comment