Monday, February 25, 2013

कथा विवेकानंद २२

                  २२ . त्यांना परमेश्वर दिसतो . 

     नरेंद्र अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला होता . साहजिकच सगळ्या प्राध्यापकांना तो आवडत असे . 
     प्राचार्य विल्यम हेस्टी वर्गात विल्यम वर्डस्वर्थ यांची ' एक्स्कर्शन ' कविता शिकवीत होते . शिकविता शिकविता त्यात समाधी , ईश्वर असे शब्द आले . नरेंद्र एकदम उभा राहिला आणि म्हणाला , ' सर , तुम्ही ईश्वर पाहिला आहे काय ? '
     प्राचार्य नरेंद्राची बुद्धिमत्ता जाणून होते . ते म्हणाले , ' नाही . पण दक्षिणेश्वरी स्वामी रामकृष्ण परमहंस नावाचे संत राहतात . त्यांना परमेश्वर दिसतो , ते त्याच्याशी बोलतात असे म्हणतात . ' 
     नरेंद्रने दक्षिणेश्वरी जाण्याचा विचार पक्का केला . 

Sunday, February 24, 2013

कथा विवेकानंद २१

                      २१. चूक आमचीच आहे .

     शाळेत एकदा शिक्षक शिकवीत होते . शिक्षकांनी एका मुलाला शिक्षा केली . शिक्षा केल्यावर रडण्या ऐवजी तो मुलगा हसू लागला . शिक्षकांच्या मागे त्यांना वाकुल्या दाखवू लागला . सगळी मुले हसू लागली . 
     शिक्षकांना आला राग . दिसेल त्या मुलाला ते ठोकू लागले . त्यांच्या तावडीत सापडला नरेंद्र . 
     शिक्षकांनी नरेंद्राला मारायला सुरुवात केली . त्याचा कान एवढया जोरात पिरगाळला कि त्यातून रक्त येऊ लागले . नरेंद्र ओरडू लागला . मुख्याध्यापक धावत आले . आणि त्यांनी मुलांची सुटका केली . 
     मुख्याध्यापक शिक्षकांना रागावू लागले . पण नरेंद्र म्हणाला . चूक आमचीच आहे . आम्ही जर मागून चिडविले नसते तर हा प्रसंग आलाच नसता . 

Saturday, February 23, 2013

कथा विवेकानंद २०

                    २०.  माझे उत्तर बरोबर आहे !

     शाळेतील प्रसंग . शिक्षक विद्यार्थ्याना शिकवीत होते. शिकविता शिकविता  त्यांना प्रश्न विचारीत होते. 
     नरेंद्राला शिक्षकांनी प्रश्न विचारला . नरेंद्रने उत्तर दिले . शिक्षकाना ते उत्तर चूक वाटले . ते म्हणाले, ' चूक.'  नरेंद्र म्हणाला, ' बरोबर. '
     शिक्षकांना आला राग . त्यांनी नरेंद्रच्या हातावर एक छडी मारली . नरेंद्र पुन्हा म्हणाला, ' बरोबर ! ' शिक्षकांनी पुन्हा एक छडी मारली . 
     नरेंद्र बरोबर म्हणत होता . शिक्षक छडी मारत होते. 
     शिक्षकांना शंका आली . त्यांनी आपले उत्तर पडताळून पाहिले . शिक्षकांचे उत्तर चूक होते, नरेंद्रचे बरोबर होते .
     शिक्षक खजील झाले . मोठ्या मनाने त्यांनी आपली चूक मान्य केली . 

Thursday, February 21, 2013

कथा विवेकानंद १९.

                       १९. मीच बोलत होतो.

     शाळेतील दोन तासिकांच्या मध्ये  बोलणे हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे. शाळेतील त्याचा आनंद वेगळाच. उपक्रमी व उपद्रवी विद्यार्थी यांची तर हि हक्काची वेळ.
     तासिकेचे शिक्षक निघून गेले होते. नरेंद्र मित्रांशी एका विषयावर बोलायला लागला. तो बोलत असतानाच पुढच्या विषयाचे शिक्षक आले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. 
     काही वेळाने कोणीतरी बोलत असल्याचा संशय शिक्षकांना आला. त्यांनी मुलांना उभे केले. चालू विषयावर काही प्रश्न ते मुलांना विचारायला लागले. कोणालाही उत्तरे येईनात. सगळी मुले उभी राहिली. नरेंद्राची पाळी आली. त्याचे शिकविण्याकडे लक्ष होते. त्याने बरोबर उत्तर दिले. 
     उत्तर चूक आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना गुरुजी शिक्षा देऊ लागले. नरेन्द्रहि उभा राहिला. 
     ' मलाही शिक्षा द्या. ' तो म्हणाला.
     शिक्षकांनी विचारले, ' तुला कशाला ? तुझे तर शिकविण्याकडे लक्ष होते. '
     नरेंद्र म्हणाला, " गुरुजी हि मुले नव्हेत, खरा मीच बोलत होतो. " 

Wednesday, February 20, 2013

कथा विवेकानंद १८

                              १८. परमेश्वर एकच

     स्वामीजींचा मुक्काम महाराजांकडे होता. महाराजांनी नर्तिकेच्या नृत्याचे आयोजन केले होते. साहजिकच स्वामीजींना आमंत्रण मिळाले. पण स्वामीजी म्हणाले, ' मी संन्याशी. मला कसले नाच अन गाणे. मी येणार नाही.' 
     कसे काय झाले कळले नाही. हि गोष्ट त्या नर्तिकेच्या कानावर गेली. तिला वाईट वाटले. नर्तिका हुशार होती. त्या दिवशी तिने सुरदासाचे भजन लावले. ' व्यक्ती, वस्तू कोणतीही असो. त्यामधला परमेश्वर एकच असतो ना ! असा त्या भजनाचा भावार्थ होता. ' अगदी तन्मय होऊन ती गात होती. भजन आळवीत होती.
     स्वामीजींना भजनाचा, गायचा मतितार्थ समजला. ते उठले. गायन स्थानी ते गेले. पूर्ण मैफल त्यांनी ऐकली. थोडा उरला सुरला भेदही नष्ट झाला होता.

Tuesday, February 19, 2013

कथा विवेकानंद १७

                     १७. मी जादुगार आहे. 

     भारतावर तेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते. भारताला भेट देण्यासाठी एक ब्रिटीश युद्धनौका आली होती. लोकांना प्रवेशिका काढून ती पाहायला जायला मिळत असे. नरेंद्रच्या मित्रांनी युद्धनौका पहायला जायचे ठरविले.
     प्रवेशिका देण्याचे काम एक ब्रिटीश अधिकारी करीत असे. मुलांची टोळी त्या अधिकाऱ्याच्या बंगल्यावर गेली. दारात एक दरवान होता. तो कसाच मुलांना आत सोडेना. उलट हुज्जत घालू लागला. मुलांशी भांडू लागला. युद्ध्नौका प्रवेशासाठी छोटेसे युद्धच झाले म्हणा ना !
     इतक्यात हातात प्रवेशिका नाचवीत नरेंद्र बंगल्यातून बाहेर पडला. ' प्रवेशिका मिळाल्या. ' तो मित्रांना म्हणाला. दरवानाला समजेना कि हे कसे घडले ? तो नरेंद्राला विचारू लागला.
     नरेंद्र म्हणाला, ' त्यात काय ? मी जादुगार आहे.  मी जादुने प्रवेशिका घेऊन आलो. ' दरवान आ वासून पाहू लागला.
     पुढे गेल्यावर नरेंद्र मित्रांना म्हणाला, ' कसली जादू अन कसले काय ! दरवान तुमच्याशी भांडायला लागताच मी इकडे तिकडे पहिले. त्या बंगल्याला मागे आणखी एक दार असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्या दाराने आत गेलो आणि प्रवेशिका घेऊन आलो. "

Monday, February 18, 2013

कथा विवेकानंद १६

                १६. कसली आलीय शिवाशिव ?

     स्वामीजी भारत भ्रमणात होते. त्यांचा मुक्काम एका रेल्वे स्टेशनाच्या फलाटावर होता. साधूचा वेश बघून माणसे येत. आपल्या शंकांचे, समस्यांचे समाधान करून निघून जात. तोंडी प्रसिद्धीमुळे माणसांची रीघ लागे. स्वामीजी सर्वाच्या अडचणी सोडवीत.
     तीन दिवस झाले. सतत येणाऱ्या लोकांमुळे त्यांना काही खायलाही मिळेना, धड झोपायलाही मिळेना. स्वामीजींची कुचंबणा फलाटाच्या बाजूला बसून चपला दुरुस्त करणाऱ्या एका चांभाराच्या लक्षात आली.
     तो स्वामीजींकडे आला आणि म्हणाला, ' स्वामीजी, गेले तीन दिवस मी बघतोय. तुम्ही नुसते बोलत आहात. पोटात अन्नाचा दाणाही टाकलेला नाही. मी तुम्हाला थोडे पीठ, तेल आणून देऊ का ? इथे बाजूला शिजवून खाता येईल. मी अन्न आणून दिले असते, पण मी चांभार असल्यामुळे.....
स्वामीजी म्हणाले. " अजिबात नाही. पीठ वगैरे काही नको. मला घरून काही भाकऱ्याच आणून दे. मी साधू आहे. मला कसली आलीय शिवाशिव !
     तो चर्मकार स्वामीजींना आनंदाने वाढत होता. स्वामीजी जेवत होते. इतक्यात काही मंडळी आपल्या शंकांच्या समाधानासाठी तिकडे आली. स्वामीजी चांभाराच्या हातचे खातात, ते पाहून ते काहीबाही बोलू लागले.                         .    स्वामीजी हसले आणि म्हणाले, ' बाबांनो, गेले तीन दिवस मी तुमच्या प्रश्नांचे समाधान करीत आहे.एकालाही मला काही खायला द्यावेसे वाटले नाही. आणि माझी दया येउन हा सहृदयी माणूस मला काही देत आहे तर ते तुम्ही नाकारता आहात ? धन्य बाबा तुमची ! "


कथा विवेकानंद १५

                १५.वेगवेगळे हुक्के कशासाठी ?

     नरेंद्र बालपणापासून चिकित्सक वृत्तीचा. प्रत्येक गोष्ट तो अनुभवून पाही. सारासार विवेकबुद्धीच्या कसोटीवर तपासून पाही. 
     विश्वनाथ दत्त नामांकित वकील होते. साहजिकच अनेक जातीची अशिले त्यांच्याकडे येत. त्या काळी जाती पाळल्या जात असत. त्यामुळे आतिथ्य पाहुणचारासाठी जातीनुसार अनेक हुक्के त्यांच्या घरी असत. दिवाणखान्यात आलेला आपापल्या जातीनुसार हुक्क्याचा वापर करीत असे.
     एके दिवशी विश्वनाथ बाबूंनी बघितले कि, नरेंद्र खुर्चीवर बसलाय आणि एकेक हुक्का ओढून पहातोय. वडिलांनी विचारले, ' बेटा हे काय करतोय ? '
नरेंद्र म्हणाला, " बाबा आमच्या घरी येणारी माणसे तर सगळी सारखी. एकाच रंगाच्या रक्ताची. आणि मग एकच प्रकारच्या, सारख्या, समान माणसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हुक्के कशासाठी ? "

Sunday, February 17, 2013

कथा विवेकानंद १४

                १४. या विश्वाचा तू मोतद्दार बन !

     विश्वानाथबाबू  कोलकात्यातील प्रतिथयश वकील. त्यांचे उत्पन्नही भरपूर. त्या काळच्या पद्धतीनुसार त्यांच्याकडे घोडागाडी होती. ती चालवायला मोतद्दार होता. त्या मोताद्दराचा पोशाखही मोठा डौलदार होता. तो घालून मोतद्दार मोठ्या झोकात चालत असे. नरेन्द्रालाही आपण त्याच्यासारखे व्हावे असे वाटत असे.
     विश्वनाथबाबू  नुकतेच कार्यालयातून घरी आले होते. नरेंद्र दिवाणखान्यात खेळत होता. मुलांवर संस्कार करण्याच्या वयातच ते झाले पाहिजेत. यावर त्यांचा कटाक्ष असे.
     विश्वनाथबाबूंनी बाल नरेंद्राला विचारले, ' बेटा नॉरेन, तू मोठा झाल्यावर कोण होणार ? '
     खेळता खेळता नरेंद्रने उत्तर दिले, ' बाबा, मी ना मोठेपणी मोतद्दार होणार ! ' विश्वनाथबाबूंचे तोंड एकदम उतरले.
     भुवनेश्वरीदेवी बापलेकाचा हा संवाद ऐकत होत्या. नवऱ्याचा चेहरा पडलेला पाहताच त्या एकदम नोरेनला म्हणाल्या, " बेटा, तू जरूर मोतद्दार बन. ती  भिंतीवरची तस्वीर बघितलीस ना ! अर्जुनाच्या रथाचा तो मोतद्दार पाहिलास ना ! अगदी तसाच, या विश्वाचा तू मोतद्दार बन ! "

कथा विवेकानंद १३

                   १३. घोडागाडी नियंत्रणात !

     विद्यार्थी दशा हि शिकण्याची, नवनवीन ज्ञान घेण्याची आयु. नरेंद्राचा बहुयामी स्वभाव बघून वडिलांनी त्याला घोडा घेऊन दिला. घोड्यावर बसणे तो लवकरच शिकला. घोड्यावर बसून मोठ्या ऐटीत फिरणे त्याला खूप आवडे.
     एकदा नरेंद्र बाजारात गेला होता. समोरून एक घोडागाडी भरधाव वेगात येत होती. गाडीचा घोडा उधळला होता. वाट फुटेल तसा तो धावत सुटला होता. त्या गाडीत एक स्त्री होती. तिची भीतीने गाळण उडाली होती. धावा धावा,वाचवा वाचवा, अशी ती लोकांना विनंती करीत होती. पण त्या उधळलेल्या घोड्याला पाहून कोणाचीच पुढे जाण्याची हिम्मत होत नव्हती.
     नरेंद्रने क्षणर्धात परिस्थिती ओळखली.  तो त्या गाडीच्या दिशेने झेपावला. आपली तीक्ष्ण नजर घोड्यावर रोखीत त्याने गाडीत उडी ठोकली. घोड्याचे लगाम खेचीत घोड्याला नियंत्रणात आणले. घोड्याला चुचकारत, वेग कमी करीत गाडी थांबविली. त्या महिलेच्या जीवात जीव आला होता. कृतज्ञतेचे अश्रूं डोळ्यात उभे राहिले होते.

कथा विवेकानंद १२

                       १२. समयसूचकता !

     नरेंद्र उत्साही युयुत्सु वृत्तीचा. अनेक उपक्रमात त्याचा सहभाग असे. तो रोज व्यायाम करायला जात असे. एके दिवशी सगळे मित्र जमा झाले. झोपाळा उभा करायचे काम करु लागले.
     तिथून एक इंग्रज माणूस जात होता. लहान मुले काम करताना बघून तो मदत करायला म्हणून आला. खांब उभा करायचे काम चालले होते. काम करताना  थोडी गडबड झाली आणि खांब कोसळला. 
     खांब कोसळला, तो नेमका त्या इंग्रज माणसाच्या डोक्यावर. त्याच्या डोक्याला जखम झाली.भळभळा रक्त वाहू लागले. सगळी मुले घाबरून गेली. भयभीत होऊन बघू लागली.
     नरेंद्राने वेळ घालविला नाही. झटकन आपला सदरा फाडला. पट्टी काढली आणि त्या माणसाची जखम बांधली. रक्तस्त्राव थांबला. नरेंद्रने मित्रांकडून थोडे थोडे पैसे जमा केले आणि त्या माणसाला औषधोपचार करण्यासाठी दिले. 


Saturday, February 16, 2013

कथा विवेकानंद ११

               ११. जीव वाचविल्याचे समाधान !

     शेजारच्या गावी जत्रा होती. बाल नरेंद्र जत्रेला गेला होता. कोणी खाऊ घेत होते. कोणी खेळणी घेत होते. नरेंद्र मात्र एका मूर्तींच्या दुकानाबाहेर घोटाळत होता. शंकराची एक सुंदर मूर्ती त्याला खूप आवडली होती. शेवटी ती मूर्ती त्याने विकत घेतली.
     शंकराच्या त्या छान मूर्तीकडे पाहत तिच्या पूजेचा, सजावटीचा विचार तो करू लागला. इतक्यात त्याचे लक्ष रस्त्यावर गेले. एक छोटे मूल रांगत  रांगत रस्त्यात  मध्ये आले होते. आणि समोरून घोडागाडी भरधाव वेगाने येत होती. थोडा वेळ गेला कि ते मूल चाकांखाली किंवा घोड्यांच्या टापाखाली आले असते.
     नरेंद्रने वेळ केला नाही. झटक्यात आपल्या हातातली मूर्ती त्याने खाली ठेवली. तीरासारखा मुलाच्या दिशेने झेपावला. क्षणार्धात त्या मुलाला त्याने बाजूला काढले. घोडागाडी निघून गेली होती. 
     नरेंद्र आपल्या मूर्ती जवळ आला. मूर्तीचे तुकडे झाले होते. तो त्या तुकड्यांना बघत होता. एका डोळ्यात मूर्ती तुटल्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यात जीव वाचविल्याचे समाधान !

Thursday, February 14, 2013

कथा विवेकानंद १०

                 १०. मी मारुतीची वाट बघतोय !

     देवळात कीर्तन होते. आई भुवनेश्वरी नोरेनला घेऊन कीर्तनाला आली होती. निरुपण चालू असताना मारुतीचा विषय आला. कथेकरी बुवा म्हणाले, ' मारुती हा सात चिरंजीव महापुरुषापैकी एक आहे. हे सातही महापुरुष आज जिवंत आहेत. '
     नोरेंनचे डोळे विस्फारले. तो कीर्तनकार बुवांना म्हणाला, ' बुवा, मला मारुतीला बघता येईल काय ? ' 
     वेळ निभाऊन नेण्यासाठी बुवा म्हणाले,'  हो. मारुतीला केळी खूप आवडतात. तो नेहमी केळीच्या बागेत येत असतो. '
     दुसऱ्या दिवशी नरेंद्रच्या खोड्या नाहीत, गडबड नाही, तो दिसतही नाही  म्हणून आई त्याला शोधायला लागली. बघतेय तर तो केळीच्या बागेत बसलाय. " अरे, इथे काय करतोय ? आणि गप्प का ? " आई म्हणाली.
    नरेन्द्र म्हणाला, ' आई, काल  बुवांनी सांगितलेय ना ! मारुतीला केळी खूप आवडतात. तो केळीच्या बागेत येतो. त्याची वाट पाहत मी बसलोय ! तो कधी येईल ग ! '
     आई म्हणाली, '' अरे वेड्या तो रामाचा भक्त ना ? रामरायाने त्याला दुसरे कोणते काम सांगितले असेल. तो दुसरीकडे गेला असेल ! आपण नंतर कधी तरी येऊया हं त्याला भेटायला ! चल आता ! ''

कथा विवेकानंद ९

                 ९. ब्रह्मराक्षस वगैरे कोणी नाही. 

     नरेंद्र मित्रांना घेऊन नेहमी एका बागेत जात असे. तेथील झाडांवर ती वानरसेना यथेच्छ खेळ खेळे, नाचे-बागडे. रात्र झाल्यावर दमून भागून घरी परते. तेथे असलेल्या माळ्याला ते आवडत नसे. काय करावे बरे ? माळ्याने  थोडा विचार केला.
     दुसऱ्या  दिवशी नेहमीप्रमाणे मुले खेळायला आली. खेळून दमल्यावर माळ्याने मुलांना जवळ बोलावले. गोड शब्दात तो म्हणाला, ' मुलांनो, ते झाड दिसतेय ना ? ज्याच्यावर तुम्ही रोज खेळताय ! त्या झाडावर एक भलामोठा ब्रह्मराक्षस राहतोय. उद्यापासून तुम्ही तेथे खेळू नका. '
माळ्याचे ते हावभाव बघून मुले भीतीने पळाली. माळी आपल्या युक्तीवर खुश झाला.
     दुसऱ्या दिवशीचा प्रसंग. नरेंद्र मुलांना खेळायला बोलावू लागला. मुले यायला तयार होईनात. नरेंद्र म्हणाला, " अरे भिऊ नका.तेथे ब्रह्मराक्षस वगैरे कोणी नाही. त्या माळ्याने आपल्याला उगाच भीती दाखविली.
     काल तुम्ही सगळे भिउन पळालात. मी काय केले ठाऊक आहे. मी त्या झाडावर जाऊन उलटा लटकलो, उड्या  मारल्या, झोके घेतले. राक्षस कुठला, कोणीही आले नाही. आणि मला हे सांगा. जर राक्षस असता, तर त्याने आम्हाला इतके दिवस खाऊन टाकले नसते का ? चला खेळायला. पळा ! धूम ! "

कथा विवेकानंद ८

                 ८. प्राणीही चांगले वागतात !

     छोट्या नोरेनच्या घरी अनेक प्राणी होते. त्यांच्याशी खेळणे त्याला  खूप आवडे. गाईला हार घालून तिची पूजा करणे हा तर त्याचा आवडता छंद. 
वडिलांनी आवडीने त्याला घोडा घेऊन दिला होता.
     स्वामी विवेकानंद अमेरिकी शिष्यासमवेत हिमालयाच्या प्रवासात होते. शिष्य असाच एकदा घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करीत होता.घोडा त्याला पाडण्याचा यत्न करीत होता. स्वामीजी त्याच्या जवळ गेले. घोड्याला त्यांनी चुचकारले. त्याच्या पाठीवरून हात फिरविला. घोडा सरळ झाला. शहाण्यासारखा वागू लागला.
     स्वामीजी म्हणाले, ' प्राण्यांना माणसाची भाषा कळते. तुम्ही त्याच्याशी चांगले वागलात,कि ते सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे वागतात. भिऊ नको आता तो काही करणार नाही. बस त्याच्यावर. '

कथा विवेकानंद ७

                            ७.स्मरणशक्ती !

      स्वामी विवेकानंद यांचा मुक्काम बेलूर मठात होता. थोडे आजारी असल्यामुळे ते झोपून असत. वाचन करीत.त्या काळी एन्सय्क्लोपिडिया ऑफ ब्रिटानिका हा ज्ञानकोश प्रसिद्ध झाला होता. त्याचे ते खंड बेलूर मठात आणले होते. 
     आजारपणात स्वामीजींचा शिष्य शरद त्यांची सेवा करी. एकदा स्वामीजी ग्रंथ वाचीत असताना शरद म्हणाला, ' स्वामीजी हे ग्रंथ वाचायचे म्हणजे आख्खा जन्म पाहिजे बुवा! '
     स्वामीजी म्हणाले, ' कुठे काय ? मी तर हे दहाही खंड केव्हाच वाचून संपविलेत. '
     शरदला आश्चर्य वाटले. अविश्वासही वाटला. स्वामीजींची परीक्षा घेण्याचे त्याने ठरविले. त्यातील एक जाडजूड खंड काढून त्याने चाळला. कठीणातील कठीण प्रश्न तो स्वामीजींना विचारू लागला. विवेकानंद त्या  प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. विषयाचे स्पष्टीकरण करू लागले. काही उतारे तर त्यांनी धडाधड म्हणूनही  दाखविले.
     शरद चकित झाला होता. 

Wednesday, February 13, 2013

कथा विवेकानंद ६

                             ६. एकाग्रता 

     स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते. असेच फिरता फिरता ते एका तळ्याकाठी आले. तेथे काही मुले नेमबाजीचा खेळ खेळत होती. तळ्यात अंड्यांची टरफले टाकली होती व बंदुकीने त्यावर गोळी झाडत होती. पण एकही गोळी अंड्यांना लागत नव्हती.
     त्या मुलांचा खेळ बघून स्वामीजी हसले. मुलांना म्हणाले, ' अरे,एकाग्रपणे नेम धरा . गोळी अचूक लागेल.'
     ' तुम्ही माराल का ? ' एक उध्दट पोरगा म्हणाला.
     स्वामीजींनी बंदूक हातात घेतली. नेम धरला आणि गोळी झाडली. टरफलाचे दोन तुकडे झाले होते. स्वामीजी गोळ्या झाडीत होते, टरफलाचे तुकडे होत होते.
     " तुम्ही कोणत्या रायफल संघाचे सभासद आहात ? " मुलांनी प्रश्न केला.
     स्वामीजी म्हणाले, " अरे, आज मी बंदूक पहिल्यांदाच हातात धरली आहे. "
     तोंडात बोटे घालून ती मुले स्वामी विवेकानंदांना बघत होती.

कथा विवेकानंद ५

                           ५. काहीही विचारा !

     स्वामी विवेकानंद आपल्या भारत भ्रमणात होते. मेरठला आले असताना योगायोगाने त्यांचे संन्यासी मित्र तिकडे पोहोचले. खूप दिवसांच्या भेटीने सगळ्यांना आनंद झाला. ते तिकडे राहू लागले.
     स्वामीजी त्या दिवसात ज्योन ल्युबक यांच्या वांग्मयाचे वाचन करीत होते. स्वामी अखंडानंद एकेक खंड आणून देत . स्वामीजी सहज तो खंड वाचीत व दुसरा आणायला सांगीत . वाचनालयाच्या प्रमुखांना आश्चर्य वाटे. एवढा जाडाजुडा ग्रंथ इतक्या कमी कालावधीत कसा वाचला जातोय ! 
     ' हा माणूस बहुधा सहकाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी हा उद्योग करीत आहे.' स्वामी अखंडानंद आले असताना ग्रंथपालाने आपली शंका बोलून दाखविली. अखंडानंद म्हणाले, ' तसे नव्हे. स्वामीजी पूर्ण ग्रंथ वाचतात. तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ शकता ! ' घडलेला प्रसंग अखंडानंदांनी स्वामीजींना सांगितला.स्वामीजी हसले.
     संध्याकाळची वेळ.स्वामीजी नवा ग्रंथ आणण्यासाठी स्वतः वाचनालयात गेले. स्वामीजी समोर दिसताच ग्रंथपाल म्हणाले, ' काहो, तुम्ही ग्रंथ चाळता कि नुसती पाने उघडता. एका दिवसात ग्रंथ संपतो, म्हणून विचारले.'
      स्वामीजी त्याला म्हणाले. " आपण कोणत्याही ग्रंथाचे कोणतेही पान उघडा आणि विचारा . आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. "
ग्रंथपाल प्रश्न विचारता झाला.स्वामीजी सांगते झाले.त्याचा आ कधी वसला त्यालाही कळले नाही.

Thursday, February 7, 2013

कथा विवेकानंद ४

                            ४. अविचल निश्चल !

     स्वामी विवेकानंद अमेरिकेत असतानाचा प्रसंग. अमेरिकी प्रत्येक गोष्ट पडताळून बघणारे.साहजिकच त्यांनी स्वामीजींची परीक्षा घ्यायचे ठरविले. 
     आपल्या गावात त्यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठरविले. तयारी केली, निमंत्रणे दिली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरु झाला. स्वामीजींची वेळ झाली आणि ते बोलायला उभे राहिले. आपल्या चिरपरिचित धीरगंभीर आवाजात ते बोलू लागले. आपला विषय मांडू लागले.
     आयोजक तरुणापैकी काही जण दूरवर उभे होते. त्यांनी बंदूक उचलली आणि स्वामीजींच्या दिशेने एक गोळी झाडली. ठोः असा आवाज झाला. गोळी सणसणत स्वामीजींच्या कानाजवळून निघून गेली. क्षणभरात दुसरी गोळी आली. स्वामीजींचे बोलणे सुरूच होते.
      दूरवर थांबलेले ते तरुण स्वामीजी जवळ आले. अभिवादन करीत ते पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागले. ते तरुण म्हणाले, '' स्वामीजी, आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. शांत-अशांत, स्थिर-अस्थिर कोणत्याही परीस्थितीत साधू  अविचल असतो. असे तुम्ही सांगत होतात. असे सांगणारे तुम्ही, स्वतः तसे आहात का ? हे आम्ही बघितले. ''
     ' बोले तैसे चाले,त्याची वंदावी पाऊले ' आम्ही तुम्हाला वंदन करतो.
    

Wednesday, February 6, 2013

कथा विवेकानंद ३

                ३. देण्याचे व्रत मी पाळलेच

     स्वामी विवेकानंदानी समाजाला भरभरून दिले. त्यांचे कानेकोपरे मोजावेत तितके थोडेच. कोणीतरी म्हटलेय, विवेकानंद समजायचा असेल तर दुसरा विवेकानंदच जन्म घ्यावा लागेल.
     बालपणाचा प्रसंग. हातात आलेली कोणतीही वस्तू तो दुसर्यांना देऊन टाकी. त्यात त्याला खूप आनंद मिळत असे. त्याच्या या स्वभावामुळे एक दिवशी आईने त्याला माडीवर बंद करून टाकले. 
     थोड्या वेळाने एक भिकाऱ्यांचा जथा रस्त्याने जाताना बिलुला दिसला. ' काहीतरी द्याहो ' असे म्हणत तो चालला होता. नरेंद्रने इकडे तिकडे बघितले. पलंगावर एक शाल पडलेली त्याला दिसली. बिले धावला तिकडे. ती शाल उचलुन खिडकीच्या गजातून त्याने भिकार्यांकडे फेकली. शेवटी माझे देण्याचे व्रत मी पाळलेच या आनंदात तो नाचू लागला.

Monday, February 4, 2013

कथा विवेकानंद २

                    २. मी नाग बघितलाच नाही.

     छोट्या नरेंद्रला ध्यानाचा खेळ खूप आवडे. मित्रांना घेऊन हा आवडता खेळ तो अनेकदा खेळे. अशीच एक दुपार. सगळे ध्यानाचा खेळ खेळू लागले. 
     सगळे डोळे मिटून बसले. थोड्या वेळाने कसला तरी आवाज आला. मुलेच ती. एकाने आपले डोळे हळूच उघडले. इकडे तिकडे पहिले. त्याचे लक्ष नरेन्द्र्कडे गेले आणि तो खाडकन उभा राहिला.
     आपल्या मित्रांना जागे करीत तो भयभीत होऊन पाहू लागला. नरेंद्र ध्यानस्थ बसला आहे. आणि त्याच्या डोक्यावर फणा करून एक भलामोठा नाग डोलतो आहे.
     मुले माता भुवनेश्वरीदेवींकडे पळाली. नागाची खबर सांगू लागली. आईलाही चिंता वाटली. ती धावत धावत आली. तोपर्यंतच्या आवाजाने तो भलामोठा नाग पसार झाला होता.
     काही वेळाने नरेंद्राने डोळे उघडले. मुलांनी त्याला नागाची गोष्ट सांगितली. ते विचारू लागले. ' तुला नागाची भीती नाही वाटली. ' नरेंद्र म्हणाला, '' मला काहीच माहिती नाही. मी नाग बघितलाच नाही.''

Sunday, February 3, 2013

कथा विवेकानंद १

             १. आई, ज्ञान दे ! विवेक दे ! वैराग्य दे !

     वडिलांचा मृत्यू झाला. उत्पन्न थंडावले.सोयरे धायरे, पाहुणे रावळे यांनी आपापल्या घरची वाट पकडली. बुडणाऱ्या नावेतील उंदीर पटापट उडी मारून पसार होतात ना तसे.
     नरेन्द्राच्या समोर प्रश्न उभ राहिला. आता करायचे काय ? नोकरीची खटपट चालू होती. नोकरी मिळायची पण कमी पगाराची. घरच्यांचा उदरनिर्वाह चालायचा कसा ?
     कोणीतरी सांगितले. रामकृष्णांना विचार. ते कालीमातेबरोबर बोलून देतील तुला नोकरी. नरेंद्र गेला रामकृष्णाकडे .
     ' मला नोकरी दे. '
    '  अरे तूच जाऊन मातेकडून मागून घे ना ! '
     नरेंद्र कालीमातेच्या गर्भगृहात गेला. डोळे झाकले. अभिवादन केले. समोर उभी होती साक्षात जगन्माता. त्रिभुवन धारिणी दुर्गा. " आई, ज्ञान दे ! विवेक दे ! वैराग्य दे ! "
     नरेंद्र बाहेर आला. रामकृष्ण म्हणाले,' बेटा नोरेन, मागितलीस का संपत्ती ? '
     नाही. विसरूनच गेलो. नरेंद्र म्हणाला. 
     ' चल, पुन्हा माग.' रामकृष्ण उत्तरले.
     पुन्हा येरे माझ्या मागल्या. रामकृष्ण हसले. नरेंद्राला म्हणाले,  '' अरे वेड्या, तुझा जन्म संपत्ती मिळविण्यासाठी नाही झालाय. तो कशासाठी झालाय तेच आई वदलीय ! तुझ्याच तोंडून ! ''
     

Saturday, February 2, 2013

कथा विवेकानंद

                            कथा विवेकानंद 

     हिंदू हा सत्य सनातन धर्म. या धर्माची पालखी वहाण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी वेळोवेळी केले. आपल्या प्रतिभेने तत्कालीन परिस्थितीवर मात करीत भारतीय संस्कृतीचा हा प्रवाह अक्षुण्ण ठेवला. स्वामी विवेकानंद हे त्या मांदियाळीतील शीर्ष नाव. 
     स्वामी विवेकानंद हे नाव ऐकले नाही असे म्हणणारा माणूस भेटणे तसे विरळच ! भारतीय समाज मानसाला जागृत करण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले. आपल्या शरीराचा कणन कण झिजविला. देशाचा विचार करणाऱ्या लोकांना प्रेरणा दिली. भारतातील सर्व क्षेत्रांना आपल्या परिस स्पर्शाने त्यांनी सोनेरी करून सोडले.
     या महामानवाचे  यंदा दीडशेवे जन्मसंवत्सर ! उद्या या संवत्सराचा शुभारंभ ! त्यांच्या लोकोत्तर कार्याला हि छोटीसी शब्दसुमनांजली !  
                    .                                                                                .              .                                                                                  कौतुक बाळे